273 जणांचा मृत्यू, 764 पूर्ण बरे झाले, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, आरोग्य मंत्रालयाची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात कोरोना विषाणू संसर्ग बाधितांची संख्या 8 हजार 447 इतकी झाली आहे. यातील 273 जणांचा मृत्यू झाला असून 764 रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती रविवारी सायंकाळी आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, कोव्हिड 19 वेबसाईट आणि राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार देशातील रुग्णसंख्या 8 हजार 897 इतकी झाली आहे. दिवसभरात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. सर्वात कमी रुग्णांची नोंद पश्चिम बंगालमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केवळ 20 टक्के रुग्ण अतिधोका पातळीवर
देशातील रुग्णसंख्या वाढत आहे; पण यातील 80 टक्के रुग्णांमधील लक्षणे अत्यंत सामान्य आहेत. तर उर्वरित 20 टक्के रुग्ण अतिधोका पातळीवर आहेत, असा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे. सद्यस्थितीत आम्हाला 1671 रुग्णांवर उपचार करावयाचे आहेत. आमची तयारी एक लाख पाच हजार बेडची झालेली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. कोरोना रुग्णांवर उपचाराचे तीन टप्पे आहेत. संशयित रुग्णास सर्वप्रथम क्वारंटाईनमध्ये ठेवले जाते. यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्याच्यावर कोरोना कक्षात उपचार सुरू केले जातात. रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास त्याच्यावर कोरोना विशेष रुग्णालयात उपचार होत आहेत. मात्र गंभीर रुग्णांची संख्या केवळ 20 टक्केच असू शकते, हे आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनावर लस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 40 ठिकाणी यावर संशोधन सुरू असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सूत्रांनी दिली.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावीत
मलेरियावरील औषध हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा वापर कोरोनाबाधित रुग्णांसाठी होऊ शकतो; पण याबाबत ठोस निष्कर्ष मिळालेला नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रुग्णांनी औषधे घ्यावीत, असा सल्ला ‘एम्स’चे अध्यक्ष रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. या औषधाचे काही दुष्परिणामही आहेत. याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान अधिक होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अत्यावश्यक सेवेतील वस्तूंची वाहतूक सुरूच
यावेळी गृह मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले की, देशभरात लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक थांबविण्यात आलेली नाही. तसेच अत्यावश्यक वस्तूंची राज्यनिहाय वाहतूकही सुरूच राहणार आहे. जिल्हास्तरीय वाहतुकीसाठी विशेष पासची सुविधा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.