संक्रमितांची संख्या 64 लाख 73 हजार 544 वर : अमेरिका-ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताने शनिवारी कोरोनाबाधितांच्या मृतांच्या आकडय़ाने एक लाखांचा टप्पा पार केला. भारतात गेल्या एका महिन्यापासून दिवसाला जवळपास एक हजार रुग्ण आढळत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून भारतातील मृत्यूदर कमी होताना दिसत आहे. भारतात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1.56 टक्के इतके झाले आहे. कोरोनामुळे जगभरात दिवसाला चार ते सहा हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. कोरोनाबळींमध्ये भारत सध्या जगात तिसऱया स्थानी असून अमेरिका आणि ब्राझीलमध्ये सर्वाधिक बळी गेले आहेत.
भारतात 13 मार्च रोजी 76 वषीय व्यक्तीचा कोरोनाच्या संसर्गाने पहिला मृत्यू झाला होता. त्यानंतर या सहा महिन्यांच्या काळात कोरोना संसर्गामुळे मृतांची संख्या 1,00,842 वर पोहोचली. देशात पहिला कोरोनाबाधितांचा रुग्ण सापडल्यानंतर आज 204 दिवसांनंतरही रुग्णसंख्या वाढतच आहे. देशात गेल्या चोवीस तासात 79 हजार 476 नवे रुग्ण आढळून आले असून 1,069 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 64 लाख 73 हजार 544 वर पोहोचली आहे. तर 1 लाख 842 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 64 लाखांवर पोहोचली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी सध्या 9 लाख 44 हजार 996 रुग्ण सध्या सक्रिय आहेत. तर 54 लाख 27 हजार 706 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे भारताचे प्रमाण हे चांगले असून ते 83.84 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. दुसरीकडे मृत्यूचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत असून ते सध्या 1.56 टक्के आहे.
आतापर्यंत देशात 7.78 कोटी चाचण्या
आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात शुक्रवारी एका दिवसात 11 लाख 32 हजार 675 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. तर आजवर 7 कोटी 78 लाख 50 हजार 403 इतक्मया चाचण्या पार पडल्या आहेत. गेल्या काही दिवसात चाचण्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने रुग्णांवर उपचार करण्याची प्रक्रियाही गतिमान झाली आहे. चार दिवसांपूर्वी चोवीस तासात तब्बल 14 लाखांहून अधिक चाचण्या करत नवा उच्चांक गाठण्यात आला होता.
महाराष्ट्रात गंभीर स्थिती
देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रात अद्यापही मोठय़ा प्रमाणावर रुग्ण आढळून येत असून राज्यातील बाधित रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 16 हजार 513 वर पोहोचली आहे. आजवर 37 हजार 480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांचा क्रमांक लागतो.
जगातील एकूण बळींपैकी 10 टक्के मृत्यू भारतात
जगभरात आतापर्यंत कोरोनामुळे 10 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतातील मृत्यूसंख्या 1 लाख झाली आहे. याचा अर्थ जगभरातील एकूण मृत्यूंपैकी 10 टक्के मृत्यू भारतात झाले आहेत. भारताच्या तुलनेत फक्त अमेरिका आणि ब्राझीलमध्ये सर्वात जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे. अमेरिकेत 2 लाख 12 हजार तर ब्राझीलमध्ये 1 लाख 45 हजार जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील एकूण मृत्यूसंख्येत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत जवळपास 38 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदरदेखील जास्त असून 2.67 टक्के इतका आहे.