‘आयसीएमआर’ने जारी केले सिरो सर्वेक्षणाचे निकाल : ग्रामीण भागात वेगाने प्रसार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) देशभरातील पहिल्या टप्प्यातील सिरो सर्व्हेचा निकाल जाहीर केला आहे. हे निकाल आश्चर्यकारक आहेत. सर्वेक्षणानुसार, मे पर्यंत देशातील जवळपास 64 लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली. हे सर्वेक्षण प्रथमच राष्ट्रीय पातळीवर करण्यात आले. मे पर्यंत 0.73 टक्के प्रौढ म्हणजेच 64 लाख (64,68,388) लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचा अंदाज लावला जात आहे. सर्वेक्षणानुसार असा अंदाज लावला गेला की, आरटी-पीसीआर चाचणीद्वारे कोरोनाच्या प्रत्येक प्रकरणाची पुष्टी करण्यासाठी भारतात 82-130 संसर्ग होते. ग्रामीण भागातही कोरोनाचा झपाटय़ाने प्रसार झाला असून विविध खेडय़ांमधील सुमारे 44 लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सिरो सर्वेक्षणातून समोर आली आहे.
ग्रामीण भागात चिंता वाढली
देशात कोविड-10 च्या प्रकरणांची संख्या 40 लाखांवर गेली असून ग्रामीण भागातही त्याच्या प्रसाराबाबत चिंता वाढली आहे, कारण तेथे वैद्यकीय सुविधांच्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे. भारताचा 1.3 अब्ज लोकसंख्येपैकी 65 टक्के हिस्सा खेडय़ांमध्ये आहे. देशात 714 जिल्हय़ांमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे आढळली आहेत, ज्यामुळे 94.76 टक्के लोक धोका पत्करत आहेत.
सर्वेक्षणाचे परिणाम
‘आयसीएमआर’च्या म्हणण्यानुसार, 11 मे ते 4 जून दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. या काळात 4,28,000 प्रौढांचे नमुने घेण्यात आले. 21 राज्यांमधील 70 जिह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. बहुतांश सर्वेक्षण ग्रामीण भागात केले गेले. या सर्वेक्षणानुसार सामान्यतः हे निश्चित केले जाते की, एखाद्या जिल्हा किंवा शहरात किती लोक कोरोनाने संक्रमित होऊन बरे झाले आहेत. हे शरीरात उपस्थित अँटीबॉडीद्वारे शोधले जाते. याव्यतिरिक्त कोरोनाची स्थितीही समजते.