दिवसभरात पंधराशे मृत्यू – 2 लाख 61 हजार 500 नवे बाधित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घातले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशात 1,501 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर, 2.61 लाख नवीन रुग्ण समोर आले आहेत. दुसऱया लाटेचा सर्वात जास्त तडाखा महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात काही दिवसांपासून 60 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. महाराष्ट्रासोबतच दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तिसगड, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्येही कोरोना संसर्ग झपाटय़ाने वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.
देशात कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर जातो की काय अशी भयावह परिस्थिती निर्माण होत आहे. मागील दोन महिन्यातच पहिल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्येचा विक्रम मोडीत निघाला आहे. विशेष म्हणजे आता दररोज विक्रमी रुग्णवाढ नोंदवली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात शनिवारी दिवसभरात 2 लाख 61 हजार 500 बाधित आढळून आले आहेत. तर 1 हजार 501 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 1 लाख 38 हजार 423 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले असून एकूण डिस्चार्ज मिळालेल्यांचा आकडा 1 कोटी 28 लाख 09 हजार 643 वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 77 हजार 150 जणांचा मृत्यू झाला असून, सध्या 18 लाख 01 हजार 316 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 1 कोटी 47 लाख 88 हजार 109 लोकांना देशात कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, लसीकरणातही वाढ झाली असून शनिवारपर्यंत विविध वयोगटातील 12 कोटी 26 लाख 22 हजार 590 डोस लाभार्थीना दिल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे.
उत्तर प्रदेशात संसर्ग झपाटय़ाने
महाराष्ट्रात काही दिवसांपासून 60 हजारापेक्षा अधिक रुग्णांची दररोज नोंद होत आहे. तसेच आता दिल्ली, छत्तिसगड, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही आता दिवसाला 20 हजारहून अधिक नवे रुग्ण सापडू लागल्याने वैद्यकीय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. उत्तर प्रदेशमधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लखनौ, कानपूर, प्रयागराज, गोरखपूर, आग्रा येथील ओपीडी बंद करण्यात आल्या आहेत. तसेच अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळून उरलेल्या शस्त्रक्रिया टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
दिल्लीत कोरोनामुळे दिवसेंदिवस परिथिती वाईट होत चालली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना रुग्णांसाठी 7,000 बेड आरक्षित करण्याची मागणी केली आहे. पत्रात त्यांनी तातडीने ऑक्सिजन देण्यास सांगितले आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे सुमारे 25 हजार रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली होती. वाढत्या रुग्णांमुळे कोरोनाचे बेड झपाटय़ाने संपत आहेत. आयसीयू बेडची कमतरता भासू लागली आहे. अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी याप्रश्नी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशीही चर्चा केली होती.
आनंद विहार आणि शकूर बस्ती रेल्वे स्थानकांवर कोरोना बेडची व्यवस्था करण्याचे आवाहन दिल्ली सरकारने रेल्वेला केले आहे. गेल्या वषी कोरोना शिखरावर असताना, रेल्वेने दिल्लीत पाच हजार कोरोना बेडची व्यवस्था केली होती. तसेच त्यांनी ही व्यवस्था यंदाही करावी. त्यांच्याकडे ऑक्सिजन सपोर्ट, वैद्यकीय कर्मचारी आणि ऑक्सिजन व्यवस्था देखील असावी अशी विनंती दिल्ली सरकारने केली आहे.