ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
देशात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. नागरिकांकडून कोरोना नियमावलीची पायमल्ली होत असल्याने रुग्णवाढीचा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केले आहे.
शाह सध्याच्या कारोना परिस्थितीवर बोलताना म्हणाले, निवडणुका आणि कोरोना रुग्णवाढ यांचा संबंध लावणे योग्य नाही. महाराष्ट्रात निवडणुका नाहीत. तरी देखील तिथे सर्वाधिक रुग्णवाढ आहे. बंगालमध्ये निवडणुका आहेत. तिथे चार हजार रुग्ण आढळत आहेत. ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्यापेक्षा निवडणुका न झालेल्या राज्यात रुग्णवाढ होत आहे.
तसेच लॉकडाऊनसंदर्भात ते म्हणाले, तूर्तास देश लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात येत नाही. त्याला केंद्राकडून तत्परताही दाखविली जात नाही. लॉकडाऊन करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही.