ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी देखील हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 26.52 टक्के आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांसाठी ही बाब दिलासादायक आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या सध्या 38 हजारांच्या उंबरठ्यावर आहे. त्यामधील 10 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
देशात आतापर्यंत 37 हजार 776 कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत. त्यामधील 10 हजारांहून अधिक रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1223 जणांचा मृत्यू झाला आहे.महाराष्ट्रात कोरोनाबाधित आणि बळींची संख्या देशात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल गुजरातचा क्रमांक लागतो.
महाराष्ट्रात मागील 24 तासात 790 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 12 हजार 296 वर पोहचली आहे. तर 2000 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.