15 नोव्हेंबरपर्यंतची आकडेवारी : मागील हंगामापेक्षा तिप्पट उत्पादन
नवी दिल्ली : देशात साखर कारखान्यांचा हंगाम सुरु झाला आहे. यामध्ये पहिल्या दीड महिन्याच्या कालावधीतच साखर उत्पादन 14 लाख टनाच्या घरात पोहोचले आहे. हा आकडा मागील हंगामाच्या समान कालावधीच्या तुलनेत तीन पटीने अधिक राहिल्याची माहिती साखर उद्योग संघटना इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांच्याकडून (आयएसएमए) देण्यात आली आहे.
चालू हंगाम 2020-21 (ऑक्टोबर-सप्टेंबर) मध्ये देशभरात 15 नोव्हेंबरपर्यंत 274 साखर कारखान्यांमधून साखर उत्पादनास प्रारंभ झाला आहे. सदरचे उत्पादन हे 14.10 लाख टनाच्या घरात पोहोचले असल्याची नोंद केली आहे. मागील वर्षातील समान कालावधीत साधारणपणे 127 साखर कारखान्यांमधून 4.84 लाख टन साखर उत्पादन करण्यात आले होते.
उद्योग संघटनेने दिलेल्या माहितीनुसार 76 साखर कारखान्यांमधून 15 नोव्हेंबरपर्यंत 3.85 लाख टन साखर उत्पादन करण्यात आले आहे. मागील वर्षात समान कालावधीत उत्तर प्रदेशातील 78 कारखान्यांनी 2.93 लाख टन साखर उत्पादन घेतले होते.
याच पातळीवर महाराष्ट्रातील 117 साखर कारखान्यांनी 5.65 लाख टन उत्पादन, कर्नाटकच्या 49 साखर कारखान्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत 3.40 लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. मागील वर्षात 34 साखर कारखान्यांचे उत्पादन 1.43 लाख टन झाले होते. गुजरातमध्ये 14 कारखाने सुरु आहेत. साखर उत्पादन 80,000 टन झाले होते.
विक्रीपेक्षा उत्पादन तेजीत
आयएसएमएच्या माहितीनुसार उत्तराखंड, बिहार, हरियाणा, मध्यप्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये जवळपास 18 साखर कारखाने सुरु आहेत. यामधून एकूण मिळून उत्पादन 40,000 टन झाले आहे. उद्योग संघटनेच्या आकडेवारीनुसार एक ऑक्टोबरला मागील हंगामामध्ये शिल्लक साठा 106.4 लाख टन होता. सध्याच्या हंगामामध्ये 310 लाख टन उत्पादन होण्याचे संकेत आहेत. या प्रकारे देशात चालू वर्षात साखर विक्रीपेक्षा उत्पादन तेजीत राहण्याचा अंदाज आहे.