53 टक्के रूग्ण होतायत बरे , 24 तासात 13 हजार 586 नवे बाधित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूस भारतीय जोरदार टक्कर देत असल्याचे शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. जगाच्या तुलनेत भारतामध्ये रूग्ण बरे होण्याचा टक्का 53.79 वर पोहचला आहे. देशात तब्बल दोन लाखांहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, मागील 24 तासात देशात 13 हजार 586 नवे रूग्ण आढळले आहेत तर 336 जणांचा मृत्यू झाला आहे. एकुण रूग्णसंख्या 3 लाख 80 हजार 532 झाली असून, एक लाख 60 हजार 384 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 12 हजार 573 जणांचा मृत्यू झाला आहे.
अन्य देशांच्या तुलनेत भारतात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. आपली वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाबरोबर नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आले आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे.
दिल्लीचे आरोग्यमंत्री ‘ऑक्सिजन’वर
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना शुक्रवारी ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. बुधवारी रात्री त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना श्वसनास त्रास होत असून निमोनियाच्या विकाराबरोबर तापही असल्याचे हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले. निमोनियामुळे त्यांची प्रकृती बिघडली असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाची सूचना
कोरोनाबाधित रूग्णांवर योग्य उपचरासाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तज्ञांचे पथक स्थापन करावे. या पथकाने हॉस्पिटलमध्ये दररोज पाहणी करावी. रूग्णांवर योग्य उपचार सुरू आहेत का, याची पाहणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही लावावेत, अशी सूचना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने केली. रूग्णांची होणारी हेंडसाळ व त्रुटी तत्काळ दूर कराव्यात असेही सुचविले.