ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरू लागली आहे. रविवारी देशात 2 लाख 22 हजार 315 नव्या संक्रमितांची नोंद झाली. तर 3 लाख 02 हजार 544 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. देशात आतापर्यंत 2 कोटी 67 लाख 52 हजार 447 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 37 लाख 28 हजार 011 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 27 लाख 20 हजार 716 रुग्ण उपचार घेत आहेत.
मृतांचा आकडा तीन लाखांवर
रविवारी देशात 4454 रुग्ण कोरोनामुळे दगावले. यापूर्वी 18 मे रोजी 4529 मृत्यूसह कोरोनाने नवा रेकॉर्ड गाठला होता. आतापर्यंत देशात 3 लाख 03 हजार 720 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
दरम्यान, आतापर्यंत देशातील 19 कोटी 60 लाख 51 हजार 962 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. रविवारी देशात 19 लाख 28 हजार 127 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.