29 जणांचा मृत्यू, एकुण रूग्णसंख्या 10815 , केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात सुरू असणाऱया कोरोना विषाणू संसर्गाचा वेग मंगळवारीही कायम राहिला. मंगळवारी सायंकाळी चारपर्यंतच्या चौवीस तासांमध्ये देशात एका दिवसात सर्वाधिक 1463 रूग्ण आढळले. तर 29 जणांचा मृत्यू झाला. देशातील रूग्णसंख्या दहा हजार 815 इतकी झाली असून आतापर्यत 353 जणांचा मृत्यू झाला आहे. 1190 रूग्ण पूर्ण बरे झाले आहेत, अशी आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
देशात 602 हॉस्पिटल सज्ज
कोरोना रूग्णांवर उपचारासाठी देशभरात 602 हॉस्पिटल सज्ज आहेत. या ठिकाणी केवळ कोरोना रूग्णांवरच उपचार होईल. सर्व ठिकाणी एकुण तीन लाखांहून अधिक बेडची सोय करण्यात आली आहे. या सर्व हॉस्टिलमध्ये अति दक्षता विभाग आणि व्हेटिलेटरची सोय आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. देशातील सर्व राज्यांमध्ये वैद्यकीय उपकरणे पोहचविण्याची सोय करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
80 कोटी नागरिकांना पाच महिने मोफत धान्य
लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तु पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 80 कोटीहून अधिक जणांना पुढील पाच महिने मोफत धान्य वाटप होईल, अशी माहिती केंद्रीय गृह ससाव पी. एस. श्रीवास्तव यांनी दिली. धान्य वाटपाबाबत तक्रारीसाठी रोजगार मंत्रालयाच्या वतीने देशात 20 ठिकाणी तक्रार केंद्र उभारले आहे. पाच हजारहून अधिक तक्रारी सोडविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.