सक्रिय रुग्णसंख्या 15 लाखांजवळ : सलग दुसऱया दिवशी हजारहून अधिक मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाची लागण झालेल्यां रुग्णांचा आकडा आता दोन लाखांपर्यंत पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2 लाख 739 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 1,038 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, 93 हजार 528 लोक योग्य उपचाराअंती बरे झाले आहेत. मात्र, सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने वाढत जाऊन 14 लाख 71 हजार 877 वर पोहोचली आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आता जगभरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण भारतात आढळून येत आहेत. दिवसभरात दोन लाख नवे बाधित सापडल्यामुळे आजपर्यंतचा उच्चांकी आकडा नोंद झाला आहे. याआधी मंगळवारी 1 लाख 84 हजार 372 नवीन रुग्ण आढळून आले होते. मृत्यूंमध्येही वाढ होत असून एका दिवसात कोरोनामुळे हजारहून अधिक मृत्यू होत आहेत. गेल्या वषी 2 ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच देशात सर्वाधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे मृत्यूदर 1.24 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट जवळपास 89 टक्के झाला आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जगभरात भारत तिसऱया स्थानी आहे. एकूण कोरोना बाधितांच्या संख्येत भारत जगभरात दुसऱया स्थानी आहे.
लसीकरणाने गती पकडली, पण…
देशात 16 जानेवारी रोजी कोरोना लसीकरण उत्सवाची सुरुवात झाली आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात 11 कोटी 44 लाख 93 हजार 238 कोरोना लसीचे डोस दिले जातात. गेल्या 24 तासात 33 लाख 13 हजार 848 लसीचे डोस देण्यात आले आहेत.
आरोग्य सुविधांची वानवा
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. सध्या दररोज जवळपास दोन लाख रुग्ण वाढत असून आरोग्य सुविधा अपुऱया पडत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण आला आहे. त्याचवेळी आरोग्य सुविधेअभावी मृत्यूदर वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे विविध इस्पितळांमध्ये बेडसह वैद्यकीय सामुग्रीची समस्या निर्माण होताना दिसत आहे
दिल्लीत विकेण्ड कर्फ्यू
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी विकेण्ड कर्फ्यूची घोषणा केली आहे. या विकेंड कर्फ्यूमध्ये सभागृह, मॉल, जीम आणि स्पा बंद असणार आहेत. तर चित्रपटगृहांना 30 टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी आहे. तसेच फक्त होम डिलिव्हरीची परवानगी आहे. आठवडी बाजारांना परवानगी आहे, मात्र त्यांना निर्बंधाचे पालन करावे लागेल. कर्फ्यूमध्ये लग्नासाठी जाणाऱयांना ई-पास दिला जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. दिल्लीतील कोरोना रुग्णसंख्या ब्रेक करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.