वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात कोरोना प्रसार वाढीचा वेग शनिवारीही कायम राहिला. 24 तासांमध्ये तब्बल 14 हजार 516 नव्या रूग्णांची भर पडली. देशातील सध्या 1 लाख 68 हजार 269 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 2 लाख 13 हजार 831 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 12 हजार 948 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
औषध तयार केल्याचा दावा
कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानंतर त्याला सुरूवातीलाच रोखणारे औषध तयार केल्याचा दावा ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने शनिवारी केला. कंपनीने म्हटले आहे की, कोरोनाची प्राथमिक लक्षण असणाऱया रूग्णांसाठी फैबीफ्लू ब्रँड नावाने विषाणूप्रतिबंधित औषध तयार केले आहे. भारतीय औषध महानियंत्रकांनी त्याच्या निर्मितीस परवानगी दिली आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. याचा मोठा ताण आरोग्य सेवेवर आहे. फैबिप्लू औषधाच्या माध्यमातून तो कमी होईल, असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे.
दिल्ली नायब राज्यपालांच्या आदेशाला आव्हान
दिल्लीत येणाऱया प्रत्येकाला पाच दिवस संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जाईल, असा आदेश दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल यांनी दिला होता. या आदेशाला आव्हान देणारी याचिका शनिवारी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली.
‘वंदे भारत मिशन’च्या माध्यमातून 2 लाख 75 हजार नागरिक परतले
विदेशामध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भारत मिशन राबवले आहे. आतापर्यंत हवाई व जल प्रवासाने 2 लाख 75 हजार भारतीयांना परत आणले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली.
दिल्ली आरोग्य मंत्र्यांवर प्लाज्मा थेरपी
देशभरात 19 जूनपर्यंत 66 लाख 16 हजार 496 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 1 लाख 89 लाख 869 चाचण्या घेण्यात आल्या, अशी माहिती ‘आयसीएमआर’च्या सूत्रांनी दिली. दरम्यान दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर प्लाज्मा थेरेपी करण्यात आली आहे. त्यांना पुढील 24 तास अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार आहे. त्यांची कोरोना चाचणी 17 जून रोजी पॉझिटिव्ह आली होती.
गरीब कल्याण रोजगार अभियानास प्रारंभ
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमधून परप्रांतीय कामगारांनी आपल्या राज्यात परतले आहेत. त्यांना राज्यांमध्येच रोजगार देण्यासाठी केंद्र सरकारने गरीब कल्याण रोजगार अभियानाची घोषणा केली होती. या अभियाचा शनिवारी बिहारमधील खगडिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून प्रारंभ झाला.