दिवसभरात 547 रुग्णांचा मृत्यू : दिल्लीत पुन्हा भीती वाढतेय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात कोरोना विषाणूची बाधा झालेल्यांचा आकडा 87 लाख 28 हजार 795 वर पोहोचला आहे. शुक्रवार सकाळपर्यंतच्या अखेरच्या 24 तासात कोरोनाचे 44 हजार 879 नवीन रुग्ण आढळले असून याच काळात 547 लोक मृत्युमुखी पडले आहेत. शुक्रवारी 49,079 जण योग्य उपचाराअंती बरे झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 81 लाख 15 हजार 580 रुग्ण बरे झाले आहेत. या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत 1 लाख 28 हजार 668 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 4 लाख 84 हजार 547 लोकांवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमध्ये कोरोना विषाणूचे सक्रिय प्रमाण, मृत्यू आणि पुनर्प्राप्तीचे प्रमाण सर्वाधिक आहे. मृत्यूची संख्या आणि सक्रिय प्रकरणांच्या दरात घट नोंदविली जात असल्याने थोडाफार दिलासा मिळत आहे. सध्या देशात कोरोनामुळे मृत्यू दर 1.48 टक्के आहे, तर रिकव्हरीचा दर 93 टक्के आहे.
दिल्लीत कोरोनामुळे गुरुवारी 104 लोकांचा मृत्यू झाला. एका दिवसात आपला जीव गमावणाऱया या रुग्णांची संख्या ही सर्वांत मोठी आहे. यावेळी 7,053 नवीन प्रकरणे आढळली आहेत. दिल्लीत आतापर्यंत एकूण 4 लाख 67 हजार 028 प्रकरणे नोंदली गेली आहेत. 4 लाख 16 हजार 580 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण मृत्यूची संख्या 7 हजार 332 झाली आहे. तेथे 43 हजार 116 सक्रिय प्रकरणे आहेत. दिवाळी सणाच्या उंबरठय़ावर दिल्लीत कोरोना प्रकरणे रोज विक्रम मोडत आहेत. सणांमुळे बाजारात असलेली गर्दी आणि प्रदूषणामुळे दिल्लीत कोरोनाचा धोका आणखी वाढू शकतो.
महाराष्ट्रात बुधवारी 4,907 नवीन रुग्ण आढळले. 9,164 लोक बरे तर 125 संक्रमितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 17 लाख 31 हजार 833 लोकांना लागण झाली आहे. यामध्ये 88 हजार 70 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 15 लाख 97 हजार 255 लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत 45 हजार 560 कोरोनामुळे मृत झाले आहेत.
बिहारमध्ये गेल्या 24 तासांत 702 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. यासह आता रुग्णांची संख्या वाढून 2 लाख 24 हजार 977 झाली आहे. यापैकी 6,392 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 2 लाख 17 हजार 422 लोक बरे झाले आहेत.