केंद्र सरकारचा निर्णय – राज्ये-केंद्रशासित प्रदेशांना सुधारित निर्देश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाच्या दुसऱया लाटेला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशात लावण्यात आलेले कठोर निर्बंध 30 जूनपर्यंत कायम राहणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंबंधी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लेखी पत्र पाठवले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध गरजेचे असल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशातील कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी टेस्टिंग, ट्रकिंग आणि ट्रीटिंग या सूत्रांचा वापर करण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी सांगितले. दरम्यान, स्थानिक परिस्थिती, गरजा आणि संसाधनांचा आढावा घेतल्यानंतर राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेऊ शकतात, असे आदेशात सांगण्यात आले आहे.
गेल्या 20 दिवसांपासून देशातील रुग्णसंख्येचा आलेख घसरत असला तरीही सध्याची रुग्णसंख्या मोठी असल्यामुळे देशात सध्या सुरु असलेले निर्बंध 30 जूनपर्यंत कायम राहतील असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली असल्याने अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवे बाधित व सक्रिय रुग्णसंख्या कमी झाली असल्याचे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी म्हटले आहे. गृह सचिवांनी राज्यांना कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी धोरणे आखण्यास सांगितले आहे. याआधी 29 एप्रिलच्या आदेशात गृह मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जास्त रुग्णसंख्या असणाऱया जिल्हय़ांमध्ये स्थानिक पातळीवर कठोर निर्बंध लावण्याची सूचना केली होती. तसेच गेल्या आठवडय़ात पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असणाऱया जिल्हय़ांची माहिती घ्या, असेही यावेळी सांगण्यात आले होते.
परिस्थितीनुरुप निर्बंध लावण्याची सूचना
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिस्थितीचा आढावा घेऊन त्वरित अंमलबजावणीसाठी प्रसिद्ध करण्यात केलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे राज्यांना कठोर निर्बंध लागू करण्यासंबंधी विचार करण्यास सांगितले आहे. याआधी आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी देशातील कगशरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगताना ऍक्टिव्ह रुग्णसंख्या मात्र अद्यापही खूप जास्त असल्याकडे लक्ष वेधले होते.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या गुरुवारी माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून देशात कहर करणाऱया कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि इतर नियमांमध्ये सातत्याने शिथिलता आणली, तरीही देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असणार आहे, असेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
कडक नियमांमुळे संसर्ग आटोक्यात
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार मागील 20 दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांची संख्या बऱयाच अंशी नियंत्रणात येताना दिसत आहे. मागील आठवडय़ाभरात 24 राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट पाहायला मिळाली आहे. देशात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवलेली असताना मागील 3 आठवडय़ांपासून पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. याच आधारे देशात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरण्यास सुरुवात झाली असून, नियमांमध्ये शिथिलता येत असतानाही हेच चित्र कायम राहणार असल्याचे आश्वासक वक्तव्य आरोग्य मंत्रालयाने केले आहे.