चोवीस तासात 48,661 नवे रुग्ण : 705 जणांचा मृत्यू : रिकव्हरी रेट 63.91 वर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. दररोज सुमारे 48 हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या 24 तासात नवीन कोविड-19 संक्रमितांचा आकडा पुन्हा एकदा 49 हजारांच्या जवळपास होता. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रविवारी देशात कोरोनाचे 48 हजार 661 रुग्ण आढळले तर 705 रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, चोवीस तासात तब्बल 36 हजारहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.
कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत सध्या जगात तिसऱया स्थानावर आहे. कोरोना विषाणू आजारामुळे आतापर्यंत 32 हजार 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 13 लाख 85 हजार 522 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. 8 लाख 85 हजार 576 लोकांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे आणि एक परदेशी रुग्ण परत गेला आहे. त्यामुळे देशात सध्या कोरोनाचे 4 लाख 67 हजार 882 सक्रिय रुग्ण आहेत. देशात आता कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 63.91 आहे. दरम्यान, देशात कोरोनाचे महाराष्ट्र सर्वाधिक बाधित राज्य आहे. गेल्या 24 तासात येथे कोरोना विषाणूची लागण झालेल्या 9,251 बाधितांची पुष्टी झाली आहे. त्याच वेळी, या काळात संक्रमणामुळे 257 लोकांचा मृत्यू झाला आहे.