542 जणांचा मृत्यू ः दिवसभरात 40 हजारहून अधिक कोरोनामुक्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून 40 हजारांच्या आसपास येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील चोवीस तासात 38 हजार 949 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच दिवसभरात 542 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गुरुवारी दिवसभरात देशात 40 हजार 026 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात चार लाखांहून जास्त सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात आतापर्यंत 3 कोटी 10 लाख 26 हजार 829 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकंदर रुग्णांपैकी 4 लाख 12 हजार 531 लोकांना आपला जीव गमवावा लागला असून आतापर्यंत एकूण 3 कोटी 1 लाख 83 हजार 876 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात 4 लाख 30 हजार 422 इतके रुग्ण उपचाराधीन आहेत. देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1.33 टक्के आहे तर रिकव्हरी दर हा 97 टक्के एवढा आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 39 कोटी 53 लाख कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत.