दिवसभरात 933 जणांचा मृत्यू : एकूण बाधितांचा आकडा 21 लाखांसमीप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून सलग दुसऱया दिवशी 60 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. मागील चोवीस तासात देशात 61 हजार 537 नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच 933 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 42 हजार 518 झाला आहे. ऑगस्ट महिन्यात भारतात आतापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही ही संख्या अधिक आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांमध्येच भारत कोरोनाबाधितांच्या सर्वाधिक रुग्णसंख्येमध्ये तिसऱया स्थानावर पोहोचला आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 लाख 88 हजार 611 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 14 लाख 27 हजार 5 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अखेरच्या चोवीस तासात 48 हजार 900 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने थोडाफार दिलासा मिळत असला तरी बाधितांच्या संख्येमध्येही मोठी वाढ होताना दिसत आहे. देशात सध्या 6 लाख 19 हजार 88 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
दिवसभरात जवळपास 6 लाख चाचण्या
आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑगस्टपर्यंत देशात दोन कोटी 33 लाख 87 हजार 171 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. शुक्रवारी देशात 5 लाख 98 हजार 778 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.