नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात गेल्या चोवीस तासात 680 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नव्याने 67 हजार 708 रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे देशातील एकूण बाधितांचा आकडा 73 लाख 07 हजार 097 वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. अजूनही देशात 8 लाख 12 हजार 390 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच आजवर 63 लाख 83 हजार 441 रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने ते बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 1 लाख 11 हजार 266 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे जीव गमावणाऱयांमध्ये सर्वाधिक 70 टक्के पुरुष आहेत, तर 30 टक्के रुग्ण महिला आहेत. यापैकी, मृत्यू झालेल्यांपैकी 53 टक्के रुग्ण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. तर 45 टक्के रुग्ण 26 ते 60 वर्षे वयोगटातील होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, संसर्गापेक्षा कमी वयाच्या रुग्णांच्या मृत्यूमध्येही झपाटय़ाने वाढ झाली आहे.
देशात मृत्यूचे प्रमाण आणि सक्रिय प्रकरणांची नोंद सतत नोंदविली जात आहे. मृत्यूची संख्या 1.52 टक्के झाली आहे. या व्यतिरिक्त, उपचार घेत असलेल्या सक्रिय प्रकरणांचे प्रमाणही 11 टक्केपर्यंत खाली आले आहे. यासह, रिकव्हरीचा दर 87 टक्के आहे. गेल्या काही दिवसात भारतात रिकव्हरीचे प्रमाण सतत वाढत आहे.
आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, 14 ऑक्टोबरपर्यंत कोरोना विषाणूच्या एकूण 9 कोटी 12 लाख चाचण्या घेण्यात आल्या असून त्यापैकी बुधवारी एका दिवसात 11 लाख 36 हजार 183 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.