घोडेस्वार सुभेदार अजय सावंत यांचे प्रतिपादन
वार्ताहर/ पणजी
घोडेस्वारीच्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामान्यासाठी आपल्या गटात पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया व इजिप्त देशातील घोडेस्वार पूर्ण ताकदीने सज्ज झाले होते. ही स्पर्धा पाकिस्तान सोडून इतर देशाने जिकंली तरी चालेल परंतु पाकिस्तानी घोडेस्वाराने ही स्पर्धा जिंकता कामा नये, अशी आपली भावना होती. देशाची मान खाली जाऊ देणार नाही, या उद्देशाने आपण जिद्दीने घोडेस्वारीचा सराव केला आणि पाकिस्तानी घोडेस्वाराचा पराभव करत विश्वचषकाचा बहुमान देशाला मिळवून दिला. तिरंग्याला सलाम केल्यानंतर आत्मविश्वास वाढत गेला व त्यानंतर आजपर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा जिंकून 156 पदके पटकाविल्याची यशोगाथा भारतीय लष्करात सुभेदारपदावर असलेले दोडामार्ग (सिंधुदुर्ग) येथील सुभेदार अजय अनंत सावंत यांनी सांगितली. पणजीतील सिद्धार्थ भवनात भारत माता की जय, गोवा संघटनेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुभेदार सावंत बोलत होते.
भारत माता की जय या संघटनेतर्फे लष्कर, शिक्षण, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱयांचा, त्यांच्या पालकांचा सन्मान करते. त्याचाच एक भाग म्हणून सिद्धर्थ भवनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिंधुदुर्ग जिह्यातील सरगवे-दोडामार्ग येथील अर्जुन पुरस्कार प्राप्त सुभेदार अजय सावंत व त्यांच्या माता अनिता सावंत यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मातृभूमी संरक्षक सुभाष वेलिंगकर, सुबेदार सावंत यांच्या माता अनिता सावंत, पुरुषोत्तम कामत, गणेश गावडे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. वेलिंगकर यांच्याहस्ते यावेळी सुभेदार सावंत आणि त्यांच्या माता अनिता सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
स्वतःच्या जिवापेक्षा देशाची किंमत अधिक : सुभेदार सांवत
देशासाठी एखादी गोष्ट करण्यासाठीचे ध्येय तुमच्यासमोर असले की तुम्हाला होणारे कष्ट त्यासमोर अगदी तोकडे वाटतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या देशाला तो बहुमान मिळवून द्यायचा असतो. आपण देशात आणि देशाबाहेर जेव्हा घोडेस्वारिच्या स्पर्धेला जायचो तेव्हा देशाचा झेंडा फडकवायचाच याच उद्देशाने जात होतो. आपल्यासाठी देशाची किंमत स्वतःच्या जिवापेक्षा अधिक असल्याचे सुभेदार सावंत म्हणाले.
आपले शिक्षण ग्रामीण भागात झाले होते. मात्र वडील सैन्यात असल्याने आणि घरातील वातावरण देशप्रेमाने भरलेले असल्याने आपल्यातसुद्धा देशप्रेम निर्माण झाले. देशासाठी काहीतरी करण्याचे जेव्हा तुमचे स्वप्न असते, तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही आकाशपाताळ एक करता. मी सुद्धा तेच केले आणि पुढेही देशाच्या गौरवासाठीच माझे जगणे असेल, असे सुभेदार सावंत म्हणाले.
जवान, किसांना सन्मान होणे आवश्यक : प्रा. वेलिंगकर
देशाचे जवान, किसान आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार देणाऱया माता पिता, शिक्षक यांचा सन्मान राखणे आवश्यक आहे. आई, वडील, बहिन आपल्या पुत्राला, भावाला सैन्यात पाठवितात तेव्हा त्यांना पुढील धोके माहिती असतात. तरीही ते त्यांना पाठवितात. शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेतले म्हणजे रक्षण होत नाही. प्राणपणाने लढणारा सैनिक भारतीय सिमेवर ताठमानेने उभा राहतो तेव्हाच देशाचे संरक्षण होते. भारत चिन युद्धात सैनिकांना योग्य शस्त्रs, थंडीपासून वाचविण्यासाठी योग्य पद्धतीचे कपडे व इतर सामाग्री दिली असती तर भारतीयांचा विजय झाला असता मात्र त्यावेळेचे नेतृत्व फिके पडले, अशी खंत श्री. वेलिंगकर यांनी व्यक्त केली.
यावेली शशांक कामत यांनी भारत मातेवर कविता सादर केली. सूत्रसंचालन रवी नाईक यांनी केले तर संतोष धारगळकर यांनी आभार मानले. प्रविण नाईक यांनी शांतीपाठ करून कार्यक्रमाचा समारोप केला.