तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव, -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची घेतली भेट
प्रतिनिधी/ मुंबई
देशात मोठय़ा परिवर्तनाची गरज असून देशातील वातावरण बिघडवण्याचे काम सुरू आहे, त्याला छेद देत एक मजबूत भारत बनवण्याची आवश्यता आहे, असे प्रतिपादन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केले. के. चंद्रशेखर राव आज मुंबई दौऱयावर होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. भेटीदरम्यान अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि राजकीय मुद्दय़ांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमचे अनेक मुद्दय़ांवर एकमत झाल्याचे राव म्हणाले. देशात परिवर्तन घडवून आणण्यासाठी इतर नेत्यांशी आमची चर्चा सुरू असून लवकरच हैदराबाद येथे एक बैठक आयोजित केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. यानंतर के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मागील काही दिवसांपासून या भेटीची चर्चा सुरु होती. या बैठकीला राव यांच्यासोबत काही आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे हे देखील या बैठकीवेळी उपस्थित होते. बैठकीनंतर के. चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
यावेळी केसीआर म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमचं अनेक विषयांवर एकमत झालं आहे. देशातील राजकीय परिवर्तनावर आमच्यात चर्चा झाली. बिगर एनडीए मुख्यमंत्री लवकरच भेटणार आहे. आम्ही देशातील दुसऱया नेत्यांशी चर्चा करु, काय अपेक्षित आहे, काय करायला हवं यावर चर्चा होईल आणि तुम्हाला आम्ही त्याबाबत सर्व माहिती देऊ.
सूडाचे राजकारण ही आपली संस्कृती नाही ः मुख्यमंत्री ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील राजकारण गढूळ बनत असल्याचं सांगत आज नवी सुरुवात आम्ही केल्याचं म्हणाले. तसंच याला आकार येण्यास काहीसा वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत, असं सांगत ठाकरे यांनी एक प्रकारे भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचा इशारा देत भाजपला थेट आव्हान दिले. देशात जे गढूळ वातावरण बनत आहे. सूडाचं राजकारण वाढत आहे. ही आपल्या देशाची हिंदुत्वाची संस्कृती नाही. हे असंच सुरु राहिलं तर देशाला भविष्य काय? याचा विचार कुणीतरी करायला हवा होता. त्याची सुरुवात आज आम्ही केलीय. संपूर्ण देशात राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरली आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणा सख्खे शेजारी आहेत. राज्याराज्यात एक आपुलकीचं नातं राहिलं पाहिजे. नवी सुरुवात आज झालीय. त्याला आकार येण्यास वेळ लागेल. देशातील मुलभूत प्रश्न सोडून इतर विषयांत हात घालण्यातच अनेकजण धन्यता मानत आहेत. पुढे जे काही ठरेल त्यावर वेळोवेळी माहिती दिली जाईल, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
देशासमोर लवकरच नवा अजेंडा ठेवणार ः चंद्रशेखर राव
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेठ घेतली. यावेळी ते म्हणाले, पवारांनी तेलंगणा राज्य बनवण्यास मदत केली ती कधीच विसरू शकत नाही. पवार आमचे वरिष्ठ नेते आहेत. हा देश नीट चालत नाही, आम्ही पवारांचा सल्ला घ्यायला आलोय. देशाचा विकास होत नाहीये, असे राव म्हणाले. तर पवारांचा राजकारणाचा अनुभव मोठा आहे. पवारांच्या अनुभवांचा फायदा होईल. पवारांनी मला आशीर्वाद दिला आहे. एकत्र येण्यावर आमची सहमती झाली आहे. इतर पक्षांनाही एकत्र आणणार तेव्हा सर्व लोक बारामतीत भेटतील आणि चर्चा करतील. त्यानंतर लवकरच देशाच्या समोर नवा अजेंडा ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशात वेगळी परिस्थिती निर्माण केली पाहीजे ः शरद पवार
नेत्यांमध्ये नेहमीच राजकीय चर्चा होत असतात, मात्र आजची चर्चा वेगळी होती असे सांगत बेरोजगारी, गरिबीसारख्या समस्या कशा सोडवायला हव्यात यावर आमची चर्चा झाली. त्यासाठी देशात एक वेगळी परिस्थिती निर्माण केली पाहिजे आणि त्या दिशेने काम केले पाहिजे, असे शरद पवार यांनी बैठकीनंतर म्हटले आहे. पवार म्हणाले, देशात बेरोजगारी, गरिबी, शेतकऱयांचे प्रश्न अशा समस्या भेडसावत आहेत. या प्रश्नांवर आमची चर्चा झाली. आम्ही राजकीय चर्चा फार केली नाही. आमची केवळ विकास, विकास आणि विकास यावरच चर्चा झाली. देशाची गरिबीपासून सुटका कशी होईल, यावर चर्चा झाली. ही सुटका होण्यासाठी एक वेगळी परिस्थिती निर्माण केली पाहिजे आणि त्यासाठी काम केले पाहिजे.
तिसऱया आघाडीची चर्चा महाराष्ट्रातून ः केसीआर
तेलंगणाचे मुख्यमंत्री राव हे तिसऱया आघाडीची स्थापना करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय. पेंद्रातल्या भाजप सरकारविरोधात वेगवेगळय़ा राजकीय पक्षांची मोट बांधण्याचे संकेत नुकतेच राव यांनी दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेठीनंतर मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर देशाच्या परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रातून होत असल्याचे राव यांनी सांगितले.
काँग्रेसशिवाय भाजप विरोधी आघाडी यशस्वी होऊ शकत नाही ः पटोले
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधी आघाडी बनवण्यासाठी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भाजपचा खरा चेहरा त्यांच्या लक्षात आला असून भाजपच्या हुकुमशाही विरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्रित आणण्याचा त्यांचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. पण काँग्रेस पक्षाशिवाय भाजपाविरोधातील आघाडी पूर्ण आणि यशस्वी होणार नाही असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहेत.