विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर
प्रतिनिधी/ पणजी
देशात तसेच राज्यात सध्या हीन पातळीवरील राजकारण सुरू आहे. सरकारच्या विरोधात आवाज उठविणाऱयांना नोटिशींची भीती दाखवून गप्प करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारच्या अशा या कृतींचा काँग्रेस पक्ष निषेध करीत असल्याचे काँग्रेस गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले. राज्यातही तोच प्रकार सुरू असून मंत्री विश्वजित राणे बुद्धीभ्रष्ट झाल्यासारखे वागत आहेत. त्यांच्या या वागणुकीचा निषेध म्हणून सोमवारी निषेध मोर्चा काढणार, असा इशारा देऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पाटकर यांनी केली आहे.
शनिवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमित पाटकर बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत मनिषा उसगावंकर, श्रीनिवास खलप व अन्य नेते उपस्थित हेते. केंद्रात राहुल गांधी व सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी समन्स बजावला आहे. अंमलबजावणी संचालनालय, आयकर विभाग तसेच अन्य सरकारी यंत्रणांचा वापर विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी केला जात आहे, असा आरोप पाटकर यांनी केला.
असाच प्रकार गेल्या काही दिवसांपासून गोव्यातही सुरू झालेला आहे. सत्ताधारी पक्षातील एक मंत्री विश्वजित राणे अहंकारी पद्धतीने वागत आहे. आपण जनतेचा प्रतिनिधी आहे याचाही त्यांना विसर पडलेला आहे. समोरच्या माणसाला किंमत देत नाही. मायकल लोबो कोण? असे पत्रकारांना ते विचारतात. विरोधी पक्षनेत्यांना विश्वजित राणे ओळखत नाही याचाच अर्थ त्यांच्या बुद्धीची पातळी कमी झाली असावी असा हल्लाबोल पाटकर यांनी यावेळी केला. पत्रकारांना किंमत देत नाही, विराधी पक्षनेत्याला किंमत देत नाही. जे आपल्या सहकाऱयांना किंमत देत नाहीत, ते सर्वसामान्य जनतेला काय किंमत देणार, अशी टीका पाटकर यांनी केली. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशा मागणी पाटकर यांनी यावेळी केली आहे.
ताळगाव, मडगाव, म्हापशातील ओडीपी का नाही रद्द केली?
कळंगूट येथील विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्या ओडीपी रद्द करू, असे पत्रकार परिषद घेऊन हे मंत्री काय वाट्टेल ते बरळत असतात. ताळगाव, मडगाव व म्हापसा येथील ओडीपी का रद्द केली नाही, असा प्रश्न पाटकर यांनी उपस्थित केला. सरकार ही एक प्रक्रिया आहे. मंत्री येतील आणि जातीलही. मंत्री हे जनतेचे प्रतिनिधी असून त्यांनी आपल्या वागण्यात आणि बोलण्यात तारतम्य राखणे जरूरीचे आहे, असा सल्लाही पाटकर यांनी दिला.
विश्वजित राणे वाघेरी प्रकरणावर गप्प का?
विरोधकांना लक्ष करून त्यांच्या मनात भय निर्माण करण्याचा प्रयत्न विश्वजित राणे करू पाहत आहे. विश्वजित राणे यांना गोव्याची खरोखरच काळजी असेल तर वाघेरी प्रकरणावर ते गप्प का राहिले. मिकासिंग यांच्या बेकायदा बांधकामाबाबत पत्रकार परिषद घेऊन का नाही जनतेशी बोलले, असा प्रश्न पाटकर यांनी उपस्थित केला आहे.