राहुल गांधी यांचा सरकारवर शाब्दिक प्रहार : अभिभाषणावरील आभार प्रस्तावात घेतला भाग
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी संसदेत बोलताना केंद्र सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ले चढविले आहेत. त्यांनी सरकारला सल्ला देत देश चालविण्यासाठी केंद्र आणि राज्यांदरम्यान संवाद आवश्यक असल्याचे म्हटले. भारतात कोणत्याही साम्राज्य आणि राज्यांना दाबले जाऊ शकत नसल्याचे राहुल यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावात भाग घेताना म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाचे नेते मणिपूरमधून आले होते. ते अत्यंत संतप्त होते. त्यांना कारण विचारले असता त्यांनी इतका अपमान कधीच झाला नव्हता, असे सांगितले. मणिपूरचे अनेक नेते काही दिवसांपूर्वी गृहमंत्र्यांच्या घरी गेले होते. तेथे त्यांना बूट काढणे भाग पाडले गेले. परंतु गृहमंत्री निवासस्थानात चप्पल घालून हिंडत होते. त्यांनी याचे छायाचित्र मला दाखविले. अखेर असा भेदभाव का? असे प्रश्नार्थक विधान राहुल यांनी केले आहे.
चर्चा अन् तडजोड
तुम्ही 3 हजार वर्षांचा इतिहास काढून बघा. मौर्य वंश, अशोक यांचा इतिहास पहा. कुणीच चर्चा आणि तडजोड न करता राज्य केले नाही. देशाच्या प्रत्येक राज्याच्या लोकांची स्वतःची भाषा अन् संस्कृती आहे.
हा वैविध्याचा गुच्छ आहे. भारत केंद्रातील एका छडीच्या मदतीने चालू शकत नसल्याचे राहुल गांधी यांनी सरकारला उद्देशून म्हटले आहे.
अर्थव्यवस्थेत दोन व्हेरिफंट फैलावताहेत
फॉर्मल सेक्टरमध्ये मक्तेदारी निर्माण होतेय. कोरोनाकाळात वेगवेगळे व्हेरिंयट येतात, तसेच हे दोन व्हेरियंट हिंदुस्थानच्या पूर्ण अर्थव्यवस्थेत फैलावत आहेत. हिंदुस्थानातील सर्व बंदरे, विमानतळे, ऊर्जा प्रकल्प, हरित ऊर्जा, खाद्यतेल जे काही देशात आहे, तेथे अडानी दिसून येतात. दुसरीकडे अंबानी हे रिटेल, ई-कॉमर्स, पेट्रोलमध्ये दिसून येतात. देशाचा पूर्ण व्यवसार काही निवडक लोकांच्या हातात जातोय असा आरोप राहुल यांनी केला.
…मेक इन इंडिया अशक्य
सर्व लघूउद्योग सरकारने संपविले आहेत. जर सरकारने त्यांना मदत केली असती तर निर्मिती क्षेत्र तयार होऊ शकले असते. सरकार मेक इन इंडियाची घोषणा देतेय. परंतु असंघटित लोकांनाच संपविले असून तेच खरे मेइ इन इंडिया घडविणारे होते. लघू आणि मध्यम उद्योगक्षेत्राला सहाय्य केल्याशिवाय मेड इन इंडिया होऊच शकत नाही. मेक इन इंडिया, न्यू इंडिया, स्टार्टअप असे सरकार बोलत सुटते आणि देशात बेरोजगारी फैलावत जात आहे. देश गप्प बसेल असा विचार करू नका. हिंदुस्थानच्या 10 टक्के लोकांकडे 40 टक्के जनतपेक्षा अधिक संपत्ती असल्याचे हा गरीब हिंदुस्थान पाहतोय. ही विषमता नरेंद्र मोदींनी तयार केली आहे. दोन हिंदुस्थान तयार करण्यापेक्षा त्यांना जोडण्याचे काम लवकरात लवकर करा असे उद्गार राहुल यांनी काढले आहेत.
देशात द्वेषाची निर्मिती
भारताच्या राज्यघटनेत राज्यांना संघ असे संबोधिण्यात आले आहे. उत्तरप्रदेश आणि अन्य राज्यांप्रमाणेच तामिळनाडूच्या लोकांना प्राथमिकता मिळायला हवी. तितकीच प्राथमिकता मणिपूर, नागालँड, जम्मू-काश्मीरलाही मिळावी. हा गंभीर मुद्दा असून यावर गांभीर्याने उत्तर इच्छितो. तुमच्या राजकारणाने देशात द्वेष निर्मिती झाल्याचे राहुल यांनी सरकारला उद्देशून म्हटले आहे.
काश्मीरप्रकरणी रणनीतिक चुका
स्वतःच्या देशाबद्दल मी अत्यंत चिंतेत आहे. सरकार या देशाला आणि याच्या लोकांना मोठय़ा जोखिमीत टाकत आहे. सरकारमुळेच चीन आणि पाकिस्तान एकत्र आले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये मोठय़ा रणनीतिक चुका केल्या गेल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
श्रीमंत अन् गरिबांचा वेगळा हिंदुस्थान…
दोन हिंदुस्थान तयार होत आहेत. एक श्रीमंताचा हिंदुस्थान तर दुसरा गरिबांचा हिंदुस्थान. या दोन्ही हिंदुस्थानांमधील दरी वाढत चालली आहे. गरीब हिंदुस्थानकडे आज रोजगार नाही. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बेरोजगारीबद्दल एक शब्दही नव्हता. सरकारने कोरोनाकाळात अपेक्षित मदत न केल्याने 84 टक्के देशवासियांचे उत्पन्न घटले आणि ते वेगाने गरिबीच्या दिशेने ढकलले जात आहेत. आम्ही 27 कोटी लोकांना दारिद्रय़ातून बाहेर काढले होते आणि 23 कोटी लोकांना तुम्ही परत दारिद्रय़ात लोटले आहे, असे राहुल म्हणाले.