निळकंठ माने यांचे प्रतिपादन : सकल मराठा समाजवतीने कार्यक्रम
वार्ताहर /कुन्नूर
देश, धर्म रक्षणासाठी युवकांनी एकत्र येण्याची गरज आहे असे प्रतिपादन हुपरी येथील निळकंठ माने यांनी व्यक्त केले. कुन्नूर येथील सकल मराठा समाजातर्फे हनुमान मंदिरामध्ये क्रांतिकारकांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
निळकंठ माने पुढे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य हे फक्त अहिंसेच्या मार्गाने मिळाले नाही तर सशस्त्र क्रांतिकारकांच्यामुळेदेखील मिळाले आहे. पण हे सांगावे लागत आहे हेच दुर्दैवी आहे. आपला देश स्वतंत्र करण्यासाठी 6 लाख 40 हजार देशभक्तांनी बलिदान दिले आहे. यांचे प्रेरणास्त्राsत म्हणजे आपले छत्रपती शिवराय आहेत. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन 350 वर्षाचा काळ उलटला आहे. तरीही शिवरायांच्या पराक्रमाला तोड नाही. देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी छत्रपती शिवरायांना आदर्श ठेवून त्याग, बलिदान केले. पण आजच्या तरुणांना क्रांतिकारक आणि छत्रपती शिवरायांचा विसर पडला आहे. पण अखंड हिंदुस्तानाचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर प्रत्येकाने छत्रपती शिवराय आणि क्रांतिकारकांना पूर्णपणे स्वीकारले पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही. आणि हे संपूर्ण आत्मसात करायचे असेल तर श्री विरुपाक्ष समाधी मठ यांच्यावतीने प. पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिनाकाठी एकदा गडकोट मोहीम आखली जाते. त्यामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे. कारण गडकोट किल्ले हे फक्त प्रेक्षणीय स्थळ नाही तर शक्तिकेंद्र आहे, असेही निळकंठ माने यांनी सांगितले.
याप्रसंगी बबन निर्मळे (निपाणी), नवनाथ पिष्टे (कागल), अमोल चेंडके यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी कुन्नूर परिसरातील तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते. ओंकार भोसले यांनी सूत्रसंचलन करुन आभार मानले.