प्रतिनिधी/ संकेश्वर
शंभर वर्षापूर्वी अज्ञानाचे प्रमाण अधिक होते. मात्र स्वातंत्र्यानंतर हे प्रमाण घटत गेले. आज भारत देश जागतिक महासत्ता बनण्याच्या वाटेवर आहे. महासत्ता बनण्याच्या या प्रक्रियेत देशातील प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. तसेच शिक्षण ही अत्यावश्यक बाब आहे. या दूरदृष्टीनेच अप्पणगौडा पाटील, बसगौडा पाटील यांनी दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक संस्थेला जन्म दिला. ही जाणीव आज बसगौडा पाटील यांच्या पुतळा अनावरणाने झाली, याचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन विजापूर मठाचे सिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले. ते रविवारी संकेश्वरात विविध विकासात्मक कामाच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री ए. बी. पाटील हे होते.
प्रारंभी रोपास पाणी घालून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष ए. बी. पाटील यांनी स्वागतपर भाषणात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. सिद्धेश्वर स्वामीजी पुढे म्हणाले, आपल्या देशात साधूसंताचा जन्म झाला आहे. आपल्याकडे लहान घरांमध्येही मोठे विचार, मोठी मने, विशाल उद्देश, निस्वार्थीपणा व अहिंसा असे पावित्र्य या भूमीला लाभल्यामुळे जगाच्या पाठीवर भारताचे कौतुक होत आहे. परकीय व्यक्तीदेखील आपण भारतात जन्म घ्यायला हवा होता, असे म्हणाले. यावरुन भारत देशातील संस्कृती, संस्कार, आपलेपणा याचा अखंड जागर होत असल्याचे पहायला मिळते. अप्पणगौडा पाटील व बसगौडा पाटील यांनी आपले जीवन फुलासारखे जगले, झाडासारखे वाढविले हे आज त्यांचा पुतळा अनावरण कार्यक्रमाला जो जनसमुदाय उपस्थित आहेत. तो त्यांच्या कार्याची जाणीव करुन देणारा साक्षीदार ठरला आहे. म्हणून आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्यातून ते आजही अमर आहेत.
सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा मोठय़ा प्रमाणात उघडल्या जात आहेत. पण या भाषेबरोबर कन्नड व अन्य भाषांमध्येही शाळा सुरु कराव्यात, असे आवाहन त्यांनी संस्था चालकांना केले.
यावेळी सहकार महर्षि बसगौडा पाटील यांच्या अर्धपुतळय़ाचे अनावरण करण्यात आले. तसेच संस्थेच्या कार्यालयीन इमारतीचे फित कापून उद्घाटन केले. इंग्रजी माध्यम शाळेच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर निवृत्त लोकायुक्त न्यायमूर्ती सुभाष आडी, निवृत्त न्यायमूर्ती अरविंद पाश्चापूरी, शिवरात्री देशीकेंद्र स्वामीजी, सूतरमठ-म्हैसूर, सिद्धेश्वर स्वामीजी, ज्ञानयोगाश्रम-विजापूर, डॉ. तोटय्या सिद्धराम स्वामीजी, गदग-डंबळ, शिवलिंगेश्वर स्वामीजी, निडसोशीमठ, सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामीजी-शंकराचार्य मठ, माजी मंत्री ए. बी. पाटील, विधानपरिषद सदस्य महातेंश कवटगीमठ, अन्नपुर्णादेवी पाटील व मिनाक्षी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी निवृत्त लोकायुक्त न्यायमूर्ती सुभाष आडी, निवृत्त न्यायमूर्ती अरविंद पाश्चापूरे, सिद्धरामय्या स्वामीजी, शिवरात्री देशीकेंद्र स्वामीजी, शिवलिंगेश्वर स्वामीजी, सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारत स्वामीजी, खासदार प्रभाकर कोरे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांतर्गत हुक्केरी तालुक्यातील अनुदानित व विनाअनुदानित शिक्षण संस्थाच्या अध्यक्षांचा, एसडीव्हीएस संस्थेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱयांचा व या संस्थेतून शिक्षण घेऊन उच्चपदावर सेवेत असणाऱया माजी विद्यार्थ्यांचा यावेळी संस्थेवतीने शाल, श्रीफळ व बसवेश्वर महाराजांचा अर्धपुतळा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एसडीव्हीएस संघाचे समन्वयक प्रा. संतोष तेरणीमठ, प्रा. माधुरी हेब्बाळकर, व्यवस्थापकीय प्रशासक बी. ए. पुजारी, संस्थेचे सचिव जी. एस. कोटगी, संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. जी. एस. इंडी, संचालक ऍड. आर. बी. पाटील, जे. डी. मुडशी, डी. एस. केस्ती, व्ही. ए. पाटील, के. सी. शिरकोळी, के. एम. निंगनूरी, एम. एस. पाटील, व्ही. बी. तोडकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. आभार ऍड. आर. बी. पाटील यांनी मानले.