प्रतिनिधी/ रत्नागिरी
जगात भारत देशाकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. पण संरक्षणाच्या दृष्टीने जो डोळसपणे विचार व्हायला पाहिजे तो होत नाही. राष्ट्राचा पाया कशात आहे, या बाबत संभ्रम आहे. त्यासाठी देशाच्या नागरिकांनी भारतीय म्हणून विचार करायला शिकले तरच आपला देश पुढे जाण्यास मदत होईल. देश संरक्षणासाठी शांततेच्या दृष्टीने डोळस असायला हवे, असे प्रतिपादन भारतीय वायू सेनेचे माजी एअर मार्शल व चिपळूणचे सुपुत्र हेमंत भागवत यांनी केले.
‘तरुण भारत’च्या रत्नागिरी आवृत्तीचा 26 वा वर्धापन दिन शुक्रवारी शहरातील जयेश मंगल कार्यालय, थिबा पॅलेस येथे मोठय़ा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी एअर मार्शल भागवत बोलत होते. यानिमित्ताने ‘ट्रेंड नवा, ध्यास नवा’ विशेषांक प्रकाशन व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची उपस्थिती होती. तसेच ‘तरुण भारत’चे संपादक जयवंत मंत्री, सहाय्यक संपादक विजय पाटील, सिंधुदुर्ग आवृत्तीप्रमुख व कोकण समन्वयक शेखर सामंत, रत्नागिरी ‘तरुण भारत’चे आवृत्तीप्रमुख सुकांत चक्रदेव आदी उपस्थित होते.
‘ट्रेंड नवा, ध्यास नवा’ विशेषांकाचे प्रकाशन
या कार्यक्रमात आजच्या कोरोनामुळे जनजीवनावर झालेले परिणाम व बदलाच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रेंड नवा, ध्यास नवा’ या विशेषांकाचे उपस्थित मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी शेखर सामंत यांच्याहस्ते संपादक जयवंत मंत्री, सहाय्यक संपादक विजय पाटील यांचा शेखर सामंत यांनी सत्कार केला. तसेच संपादक जयवंत मंत्री यांच्याहस्ते कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर, माजी एअर मार्शल हेमंत भागवत तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुकांत चक्रदेव यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांच्या कार्याचा आढावा व परिचय करून दिला. तर 100 वर्षापूर्वीपासून सुरु झालेल्या ‘तरुण भारत’च्या आतापर्यंतच्या देदीप्यमान वाटचालीचा लेखाजोखा मांडला. लोकांच्या मनामध्ये आज उत्तम विचार करण्यासाठी मदत व्हावी, यासाठी ‘तरुण भारत’चा 102 वर्षांचा तर रत्नागिरी आवृत्तीच्या 26 व्या वर्षांच्या वाटचालीचा परामर्ष आपल्या प्रास्ताविकातून उपस्थितांना करुन दिला.
‘तरुण भारत’मध्ये परिस्थितीनुरूप वार्तांकनः डॉ. गर्ग
या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग बोलताना म्हणाले, आपल्याकडे खऱयासाठी झटणारे अशी दैनिके आहेत. त्यामध्ये त्यांनी ‘तरुण भारत’चा आवर्जून उल्लेख केला. ‘तरुण भारत’बद्दलच्या अपेक्षा समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक बाब जी खरी आहे ती धरुन त्यावर बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकला जातो. परिस्थितीला धरुनच बातमीरुपाने वृत्तांकन केले जाणे, ही आनंदाची बाब असल्याचे डॉ. गर्ग यांनी नमूद केले.
देशाची अबाधितता राखू शकलो नसल्याची खंतः भागवत
माजी एअर मार्शल हेमंत भागवत यांनी देशाच्या एकंदरीत संरक्षण व्यवस्थेबाबत आपल्या 38 वर्षांच्या सेवा कार्यकालातील अनुभवाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. सन 1980 मध्ये एअरफोर्समध्ये सेवेत रुजू झाल्यानंतर महाराष्ट्रात सेवा करण्याची संधी लाभली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक देशाची संरक्षणाच्या दृष्टीने शाश्वत मूल्ये असतात. मात्र देशाचा गेल्या 15 वर्षाचा इतिहास पाहता देशाची अबाधितता राखू शकलो नसल्याचे सांगितले. त्यावेळी अक्साई चीन, पाकव्याप्त काश्मीर, सियाचिन, उरी, पुलवामा अशा शेजारी राष्ट्रांच्या कुरापतींनी होणाऱया हल्ल्यावर त्यांनी प्रकर्षाने प्रकाश टाकला.
शत्रू व मित्र कोणचा सांगोपांग विचार करायला हवा
भारतीय सैनिकांविषयी मोठा आदर आहे. संरक्षणाकडे मोठय़ा भावनेने आपण आज पाहतो. जगात आपल्याकडे काहीही कमी नाही. पण संरक्षणपणाच्या बाबतीत जो डोळसपणे विचार करायला पाहिजे तो केला जात नाही. शत्रू व मित्र कोण याचा सांगोपांग विचार करुन पाठपुरावा करणे गरजेचे आहे. सैनिकांबद्दल आदर आहे, पण दरवर्षी 100 सैनिक का मारले जातात, हा प्रश्न समाजात कधीही विचारला जात नाही. आज टेक्नॉलॉजी बदलाचा संरक्षणावर परिणाम होत असतो. आपण चंद्रावर जाण्याची तयारी करतोय. पण सैन्याला लागणारी शस्त्रास्त्रs बनवण्यात कमी पडतोय. खऱया अर्थाने सुरक्षित व्हायचे असेल तर सशक्त राष्ट्र बनले पाहिजे. संरक्षण विषयात राजकारण करता कामा नये पण आज ते केलं जात असल्याची खंत त्यांनी यावेळी माजी एअर मार्शल भागवत यांनी व्यक्त केली.
अन्यायाविरुध्द झुंजणारे व्रत ‘तरुण भारत’ने जपलेय
‘तरुण भारत’चे संपादक जयवंत मंत्री यांनी ‘तरुण भारत’च्या 102 वर्षाची वाटचाल विषद करताना ब्रिटीश राजवटीपासून कै. बाबूराव ठाकुरांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेतून ‘तरुण भारत’च्या चळवळीचा प्रवास सुरु केला. यात त्यांचे आजोबा, पत्नी यांना तुरुंगवासही सहन करावा लागला. संयुक्त महाराष्ट्राची सुरु असलेली चळवळ पुढे किरण ठाकूर यांनी पुढे नेण्याचे काम आजही सुरु ठेवले आहे. किरण ठाकूर यांनी आज या चळवळीच्या माध्यमातून संपादक नाही तर एक चळवळ, अन्यायाविरुध्द झुंज देणारे हे व्रत ‘तरुण भारत’ने जपले आहे. अकुशलांना शिक्षण अशा विविध पैलूंनी त्यांच्या कार्याची वाटचाल सुरु असल्याचे मंत्री यांनी आवर्जून नमूद केले. सूत्रसंचालन विश्वेश जोशी यांनी तर आभार प्रदर्शन सिंधुदुर्गचे आवृत्तीप्रमुख शेखर सामंत यांनी केले.
या कार्यक्रमावेळी ‘तरुण भारत’चे जाहिरात विभागप्रमुख भूषण प्रभूदेसाई, वितरण विभागप्रमुख मिलिंद कुलकर्णी, प्रशासकीय व्यवस्थापक सुमित राऊत तसेच चिपळूण, खेड, दापोली, राजापूर, संगमेश्वर येथील कार्यालय प्रतिनिधींची उपस्थिती लाभली होती. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला ‘तरूण भारत’च्या अनेक वाचक, मान्यवर, हितचिंतकांनी उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला.