अतिवृष्टीमुळे वीट व्यवसाय लांबणीवर : मजुरांचे तांडे गावात दाखल, व्यवसायासाठी लागणाऱया साहित्याची जुळवाजुळव सुरू : वीट व्यवसायाच्या पूर्वतयारीला वेग
प्रतिनिधी /येळ्ळूर
बेळगाव तालुक्यातील देसूर गावचा मुख्य व्यवसाय जळाव विटांची निर्मिती हाच आहे. दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होणारा हा व्यवसाय अतिवृष्टीमुळे सद्या लांबणीवर पडला आहे. वीट तयार करण्यासाठी दरवर्षी येणारे मजुरांचे तांडे आता येऊन दाखल झाले आहेत. काहीजण येण्याच्या तयारीत आहेत. आलेल्या मजुरांनी बांबू, लाकडे, प्लास्टिकच्या साहाय्याने छोटी खोपवजा घर बनविण्यास सुरुवात केली आहे. मुलेबाळे, गुरे-ढोरे, कुत्री, कोंबडी मांजरासह सर्वजण येऊन दाखल झाले आहेत. त्यामुळे वीट व्यवसायाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे.
वीट उत्पादकांनी कायमस्वरुपी वीट तयार करण्याच्या ठिकाणी आवश्यक वाळूयुक्त तांबूस माती, लाकूड, भाताची पोल, पाणीसाठा आदी साहित्य दास्तान केले आहे. वीट मारण्याची जागा सपाट बनविली आहे. विटांना उपयुक्त माती, पाण्याचा साठा, वाहतुकीला सुलभ रस्ता अशा ठिकाणी विटा काढल्या जातात.
वैशिष्टय़पूर्ण वीट
देसूरच्या सातेरी माउली व रेल्वेलाईनच्या पट्टय़ात तांबूस, पांढरट, वाळूयुक्त माती आढळते. सखोल अनुभवानंतर वेगवेगळय़ा मातीच्या मिश्रणापासून कच्ची वीट बनविली जाते. पाण्याचेही योग्य मिश्रण वापरले जाते. बांधकामाला उपयुक्त आकाराचे साचे वापरले जातात. चिखलही चांगला कमावला जातो. वीट काळजीपूर्वक भाजली जाते. विटांची नात्री आणि आकार शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जातात.
वीट चांगली-वाईट परीक्षा
पांढरट तांबूस वीट इतकी मजबूत बनविली जाते की ती सिमेंटच्या विटांनाही मागे टाकते. भाजलेल्या विटेचे वजन पहिल्यांदा आणि त्याच विटेचे नंतर एकदिवस पाण्यात ठेवून वजन केले जाते. विटेने प्रमाणित पाण्यापेक्षा जास्त पाणी राहिल्यास वीट ठिसूळ व खराब समजली जाते. संपूर्ण बेळगाव ते खानापूरपासून पुढे गोव्यापर्यंत दुतर्फा जळावू विटा काढल्या जातात. पण अधिक गुणवत्तेची वीट देसूरचीच समजली जाते.
हा प्रकारही तोच
अधिक दर मिळविण्यासाठी इतरत्र ठिकाणच्या सुमार विटाही देसूरच्याच जळावू विटा म्हणून सांगून विकल्या जातात. एकप्रकारे बासमती तांदळात इंद्रायणी तांदूळ मिसळून बासमतीच्या दराने विकण्याचाच हा प्रकार आहे.
टिचभर पोटासाठी
आपले मूळ गाव सोडून येथे कामानिमित्त येणाऱया कामगारांचे हाल पाहवत नाहीत. कुडकुडणारी थंडी, पहाटे उठून चिखल तयार करणे (तुळी मारणे), मुलांची शाळा नाही, जनावरे, कुत्र्या-मांजरांसह या बिऱहाडांची अवस्था पाहिली तर खरोखरच अत्यंत किळसवाणे वाटते. पण परिस्थितीला तेंड देण्यासाठी त्यांना हे करावेच लागते. आधी…. मग फळ ही म्हणही येथे फोल ठरते.