अध्याय अकरावा
भगवंत म्हणाले, उद्धवा दिवे वेगवेगळे असले तरी प्रकाश एकच असतो त्याप्रमाणे त्रिभुवनामध्ये आत्मा हा एकच आहे. चंदनाचे तुकडे पुष्कळ असतात पण त्या सर्वामध्ये सुवास एकच असतो. त्याप्रमाणे आत्म्याच्या रूपाने मी एकच अविनाश परमात्मा सर्वांच्यात वसत असतो. आत्म्याला शरीराच्या अवस्था लागू होत नाहीत. मी आत्म्यामध्ये अविनाशरूपाने असतो. वस्तू, प्राणी वेगवेगळे दिसत असले तरी सगळय़ांच्यात माझे आत्मतत्त्व एकच असते. ज्याप्रमाणे मिठाई वेगवेगळय़ा रंगाची, स्वादाची, आकाराची असली तरी सगळय़ा प्रकारच्या मिठाईत गोडवा आणायचे काम एकच साखर करते त्याप्रमाणे एकच आत्मतत्त्व सर्व प्राणीमात्रांना चैतन्य प्रदान करून त्यांच्या हालचाली घडवून आणते. भागवतातील मुख्य तत्त्व आणि ज्ञानाचे शुद्ध सत्त्व ते हेच. जीवाची बद्धता किंवा मुक्तता मला परमात्म्याला मुळीच लागू होत नाही. बद्ध आणि मुक्त या अवस्था शरीराला लागू आहेत. जो त्याची यातून सुटका करून घेतो तो मला येऊन मिळतो. आता प्रसंगाला अनुसरून बद्ध-मुक्ताची लक्षणे तुला सविस्तर सांगतो. पहिले लक्षण म्हणजे बद्ध आणि मुक्त दोघेही देहामध्ये असतात पण त्यांचे स्वभाव परस्पर विरुद्ध असतात. यातील देही जो असतो तो देहाला सर्वस्व मानत असतो. स्वतःला कर्ता समजत असतो पण बहुतेक वेळा त्याच्या मनासारख्या गोष्टी घडत नसल्याने रात्रंदिवस दुःखात असतो. दुसरा विदेही असल्याने त्याला ईश्वरी इच्छेनुसार देहाच्या हालचाली घडत असून तो कर्ता नसून ईश्वर कर्ता आहे ही खात्री असल्याने वाटय़ाला आलेले काम करून तो स्वस्थ बसतो. परिणामी तो सदासर्वकाळ सुखी असतो. वास्तविक पाहता आत्मा आणि परमात्मा हे वेगळे नाहीतच. ते एकरूप आहेत पण माणसे स्वतःच्या बुद्धीने कर्मे करतात त्यामुळे त्यांचा आत्मा मुक्त न होता त्या कर्माची फळे भोगण्यासाठी अंत्यसमयी एका देहातून दुसऱया देहात प्रवेश करतो. मी म्हणजेच देह अशी देहबुद्धी बाळगल्यामुळे देहबुद्धीच्या पोटी अनेक जन्ममरणे वास करत असतात. पाखंडी, लोकांना गैरमार्गाने नेत असतात. टिळे-माळा-मुद्रा धारण करून संतांची निंदा करतात. भक्ताचे सोंग आणून पापाचरण करतात. त्यांचा नारायण कधीच उद्धार करत नाही. लोकांच्या अंतःकरणातील सर्व मी जाणतो म्हणूनच मला ‘अंतर्यामी’ असे म्हणतात. मी सर्वसाक्षी व सर्वज्ञ असल्याने धर्म पाळणारे कोण अधर्मी कोण हे जाणतो. धर्म पाळणाऱयांनाच विदेही अवस्था प्राप्त करून देऊन मोक्षावस्थेपर्यंत नेतो. भक्त असल्याचा आव आणून जो स्वतःच पातक करतो, त्याला ‘दांभिक’ म्हणतात. त्याचा उद्धार ईश्वर करत नाही. हे लोक सर्वार्थाने बद्ध समजावेत. बद्ध म्हणजे एका जागी बांधलेले. हे लोक त्यांच्या स्वार्थी स्वभावामुळे जन्ममृत्युच्या फेऱयात अडकून पडतात. याउलट जे लोक निस्वार्थी असतात ते कर्मफळांचे सेवन न करता, आत्मस्वरूपाची जाणीव राखून जीव व प्रपंच यांचे केवळ साक्षी असतात. त्यांना आत्मज्ञान प्राप्त होते त्यामुळे ते अलिप्त राहू शकतात. त्यांना नित्य मुक्त असे म्हणतात. आत्मविद्येच्या प्रभावाने असा मनुष्य सर्वव्यापक असून सर्वांपासून अलिप्त असतो. देहात असूनही देहबुद्धी नसणे हेच मुक्ताचे लक्षण होय. त्याच हेतूने त्याला देहात असूनही ‘विदेही’ म्हणतात. स्वप्नात राजा असला काय आणि भिकारी झाला काय जागे झाल्यावर दोन्ही खोटेच असते त्याप्रमाणे देहाचे सुखदुःख मुक्तांना मिथ्या वाटते. येथे मिथ्या शब्द मुद्दामहून वापरला आहे. मिथ्या वाटणारी गोष्ट अस्तित्वात असते पण जाणत्याना ती त्रासदायक होत नाही. उदाहरणार्थ मुक्त मनुष्यालाही सुखदुःख भोगावे लागते पण त्याला त्याचे काहीच वाटत नाही कारण त्याला हे माहीत असते की, सुख आणि दुःख यांची मजल माणसाच्या शरीरापुरती मर्यादित असते पण हा मुक्त असल्याने तो दोन्हींपासून अलिप्त राहू शकतो. या अर्थाने प्रपंच हा मिथ्या आहे असे ज्याने जाणले त्यालाच ‘मुक्त’ असे म्हणतात. स्वप्नातले अनुकूल प्रतिकूल जे काय असेल ते सारे जागृतीत आठवते, पण त्याचे सुखदुःख काही बाधत नाही त्याप्रमाणेच संसारासंबंधी जे काही असते, ते मुक्ताच्या दृष्टीने स्वप्नवत असल्याने त्याला बाधत नाही.
क्रमशः