नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूचे 2 लाख 35 हजार 532 नवीन रुग्ण आढळले असून 871 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात गेल्या आठवडय़ापासून दैनंदिन कोरोनारुग्णांमध्ये घट होत असली तरी मृत्यूंमध्ये वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी दिवसभरात 2 लाख 35 हजारहून अधिक रुग्ण सापडले होते. यापूर्वी गुरुवारी 2 लाख 51 हजार नव्या बाधितांची नोंद झाली होती. एकंदर दोन दिवसात 15 हजार 677 रुग्ण कमी झाले आहेत. तसेच सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 लाख 4 हजार 333 वर आली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱयांची संख्या 4 लाख 93 हजार 198 झाली आहे. आकडेवारीनुसार, शुक्रवारी दिवसभरात 3 लाख 35 हजार 939 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 83 लाख 60 हजार 710 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 164 कोटींहून अधिक डोस
देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 165 कोटींहून अधिक कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी दिवसभरात 56 लाख 72 हजार 766 डोस देण्यात आल्यानंतर आतापर्यंत 165 कोटी 4 लाख 87 हजार 260 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.