बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा-नानचे
वार्ताहर / दोडामार्ग:
पावसाळा सुरू झाला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील रस्त्यांची डागडुजी केली नाही. जिओ केबल खोदाईमुळे रस्त्याच्या निकामी झालेल्या साईडपट्टीचे कामही निकृष्ट झाले आहे. पावसाळय़ापूर्वी ही कामे करणे गरजेचे होते. मात्र, उन्हाळय़ात त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी या परिस्थितीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असून भविष्यात अपघात होऊन जीवितहानी झाल्यास बांधकाम विभागावर भाजपच्यावतीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा भाजपचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष संतोष नानचे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांना दिले असून त्यात तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे बांधकाम विभागाने कसे दुर्लक्ष केले, ते नमूद केले आहे.
पावसाळा सुरू झाला तरी दोडामार्ग शहरातील गटार साफसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे गटारातील पाणी रस्त्यावर येऊन नदीचे स्वरुप प्राप्त होते. हीच परिस्थिती तालुक्यातील इतर रस्त्यांचीही आहे. जिओ केबल खोदाई व मणेरी- वेंगुर्ले पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन टाकण्यासाठी केलेली खोदाई यामुळे दोन्ही राज्यमार्गांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी साईडपट्टीचे काम करण्यात आले. पण तेदेखील निकृष्ट झाले. पावसाळय़ापूर्वी रस्त्यांची डागडुजी करावी आणि निकृष्ट साईडपट्टीच्या कामाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मात्र, त्याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले परिणामी भविष्यात अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा त्याला जबाबदार ठरणार असून भाजपच्यावतीने मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा नानचे यांनी दिला आहे.