दोडामार्ग / वार्ताहर:
दोडामार्ग तालुक्यातील गावागावात व प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून कायदेविषयक माहिती पुरविणार आहे असे प्रतिपादन येथील दिवाणी न्यायाधीश वाय. पी. बावकर यांनी केले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून नुकतीच 75 वर्षे पूर्ण झाली असून त्याचा अमृतमहोत्सव देशभरात साजरा केला जातो आहे या महोत्सवाचा एक भाग म्हणून पॅन इंडिया जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त आज दोडामार्ग पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड दाजी नाईक, अँड सोनू गवस, अँड विशाल नाईक, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अँड सोनू गवस म्हणाले की, सध्याच्या काळात लोकअदालतीचे फार महत्व असून माध्यस्थांमार्फत वादविवादाची प्रकरणे मिटविणे फार गरजेचे आहे. श्री गवस यांनी लोकअदालतीचे तसेच वाद विवादाची प्रकरणे मिटण्याचे फायदे देखील उपस्थितांना पटवून सांगितले. लोकअदालतच्या माध्यमातून कोणतीकोणती प्रकरणे मिटविली जातात त्याबद्दलची ही सविस्तर माहिती श्री. गवस यांनी दिली. गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांनी न्यायाधीश श्री. बावकर तसेच उपस्थित सर्वांचे स्वागत केले.