दोडामार्ग / वार्ताहर:
कोकणचे सुपुत्र, केंद्रीय मंत्री तथा भाजपचे नेते नाम. नारायण राणे हे उद्या रविवारी दोडामार्ग शहरात येत आहेत. दोडामार्गातील व्यापारी बांधव, नागरिक, विविध पदाधिकारी – कार्यकर्ते आदींच्यावतीने अर्थात तमाम दोडामार्ग वासीयांच्यावतीने नाम. राणे यांचे जंगी स्वागत करणार असल्याचे दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी दै. तरुण भारतशी बोलताना स्पष्ट केले. दोडामार्गवासियांना विकासाकरिता नाम. राणें शिवाय अन्य पर्याय नाही हे आजच्या निष्क्रिय सत्ताधाऱ्यांनीच दाखवून दिले असा उपोरोधीक टोलाही श्री. नानचे यांनी लगावला.
केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते नारायण राणें हे उद्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून दोडामार्ग शहरात येत आहेत. केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतरची त्यांची दोडामार्गला ही पहिलीच भेट आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री. नानचे बोलत होते. श्री. नानचे पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठव्या तालुक्याची निर्मिती करून दोडामार्ग शहराला व तालुक्याला विकासाचे वेगळे पर्व श्री. राणें यांनी खुले करून दिले. आज दोडामार्गात तालुका स्तरावरील सर्व महत्वपूर्ण कार्यालये सुरू आहेत. तालुका मुख्यालय उभे राहिले आहे. बसस्थानक, न्यायालय, आयटीआय, यांसारख्या इमारती मोठ्या दिमाखात दोडामार्गात उभ्या राहिल्या. यामुळे दोडामार्ग शहराच्या विस्तारीकरणला, विकासाला, व्यापार – उद्योगाला मोठा वाव मिळाला हे सर्व श्री. राणें यांच्यामुळेच घडले. याचा प्रत्येक दोडामार्गवासीयाला सार्थ अभिमान आहे. गोवा व सिंधुदुर्ग पर्यायाने … महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांचे प्रवेशद्वार असलेल्या आमच्या दोडामार्गचा चेहरा मोहरा केवळ नाम. राणेंमुळेच बदलला असे नानचे यांनी स्पष्ट केले.
दोडामार्ग तालुक्याला राणें शिवाय पर्याय नाही – नानचे
खुद्द दोडामार्ग शहरापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या अनेक गावांना पूर्वी सावंतवाडी तालुक्याला शासकीय कामकाजानिमित्त ये जा करावी लागत असे मात्र राणेंच्या तालुका निर्मितीमुळे आज या गावातील लोकांची दूरवरची पायपीट वाचली. आजची सद्यस्थिती पाहता राणेंशिवाय दोडामार्ग शहराला तसेच संपूर्ण तालुक्याला अन्य पर्याय नाही. हे राज्यातील सध्याच्या निष्क्रिय सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिले आहे. दोडामार्ग – बांदा, दोडामार्ग – विजघर, दोडामार्ग – आयी या प्रमुख रस्त्यांसोबत तालुक्यातील गावागावांतील रस्त्याच्या दुरावस्थेवरून सत्ताधारी गावागावातून टार्गेट बनले आहेत. तिलारी खोऱ्यातील रानटी हत्तींनचा हैदोस असो किंवा तिलारी प्रकल्पाअंतर्गतच्या शेतकऱ्यांचे प्रश्न असो अथवा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तालुक्यातील गावागावांत उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीचे नियोजन करण्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात सत्ताधारी पूर्णतः निष्क्रिय ठरले आहेत. तालुक्याला श्री. राणें शिवाय अन्य पर्याय नाही हे सत्ताधाऱ्यांनीच दाखवून दिले आहे. ज्या आडली येथील एमआयडीसीची निर्मिती नारायण राणें यांनी केली त्या एमआयडीसीमध्ये अद्यापपर्यंत एकही उद्योग सुरू होऊ शकला नाही. याची चीड प्रत्येकाच्या मनात आहे. येणारी दोडामार्ग ची नगरपंचायत असो किव्हा अन्य निवडणूका असो या सर्व निवडणुकीत राणें यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उज्वल यश मिळवू असा ठाम विश्वास श्री. नानचे यांनी शेवटी व्यक्त केला. आमचा तालुका हा नारायण राणें यांनीच निर्माण केला असून त्याचा विकास हे केवळ राणें च करू शकतात येऱ्यागबाळ्यांचे ते काम नाही असेही नानचे म्हणाले.