प्रतिनिधी/कोल्हापूर
देशासाठी प्राण पणाला लावणारे हुतात्मा जवान संग्राम पाटील यांच्यावर आज त्यांच्या गावी शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. शहीद जवान संग्राम पाटील अमर रहे! वीर जवान अमर रहे च्या घोषणा देत या वीर सुपुत्राला जड अंतकरणांनी अखेरचा निरोप देण्यात आला. संग्राम यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गावकर्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील या दोन्ही शहीद जवानांना प्रत्येकी एक कोटींची मदत देणार असल्याचे सांगितले.
शहीद संग्राम पाटील यांनी देशासाठी दिलेले योगदान युवकांना प्रेरणादायी आहे. दोन वर्षाची सेवा वाढवून त्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यांच्या कुटुंबीयावर मोठा आघात झाला आहे. राज्य शासन संग्राम पाटील यांच्या कुटुबीयांच्या पाठीशी ठाम आहे. जिल्ह्यातील शहीद झालेल्या दोन्ही जवानांच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी एक कोटी रुपयाची मदत देणार असल्याची घोषणा करून पालकमंत्री सतेज पाटील यांनी शहीद कुटुंबियांना आधार दिला.
गेल्याच आठवडयात आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांना देशसेवा करत असताना वीर मरण आले होते. ही ताजी घटना असतानाच पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील शहीद जवान हवालदार संग्राम पाटील यांना वीरमरण आले. कोल्हापूर जिल्ह्यात ही दुसरी घटना घडली आहे