रोहित शर्माबाबत दोन विभिन्न टोके दिसून आल्यानंतर बीसीसीआय व मुंबई इंडियन्स यांच्यात सुसंवाद आहे का, याबद्दल ज्याप्रमाणे साशंकता निर्माण झाली, त्याचप्रमाणे खेळाडूंच्या दुखापत व्यवस्थापनाबद्दल बीसीसीआय व संबंधित प्रँचायझी यांच्यात समन्वय, सुसंवाद आहे का, हा देखील प्रश्न उभा ठाकला आहे. असा समन्वय असता तर एकीकडे, रोहितला भारतीय संघातून वगळले जात असल्याची घोषणा केली जात असताना, दुसरीकडे, त्याच्या प्रँचायझीकडून तो तंदुरुस्त असल्याचे दाखले दिले गेले नसते. आता सर्वांच्या मनात पहिला प्रश्न हा असेल की, रोहित खरोखरच ऑस्ट्रेलिया दौऱयाकरिता पूर्ण तंदुरुस्त नाही का? आणि जर नसेल तर बीसीसीआयने त्याला अद्याप आयपीएल खेळणे थांबवण्याची सूचना का केलेली नाही? याचबरोबर, मुंबई इंडियन्सतर्फे उर्वरित लढतीत तो जर खेळला तर पुढे काय?
भारतीय संघाचे फिजीओ नितीन पटेल हे सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्येच आहेत आणि त्यांनी कदाचित रोहित शर्माच्या दुखापत व सावरण्याचा कालावधी याबाबत अहवाल दिला असेलच. पण, बीसीसीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याचा कोणताही उल्लेख नाही.