वार्ताहर / उचगाव
करवीर तालुक्यातील निगडेवाडी येथे पंचगंगा नदीघाटावर पाच दिवसांपासून सुरू असलेले छत्रपती प्रशासन महिला आघाडीचे जलआंदोलन रविवारी मागे घेण्यात आले. खासदार धैर्यशील माने यांनी दोन आठवडय़ात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
शिरोळ, हातकणंगले येथील पूरग्रस्त महिलांचे फायनान्स कंपन्यांच्या कर्ज वसुलीप्रश्नी निगडेवाडी येथे पंचगंगा पात्रात पाच दिवसांपासून जलआंदोलन सुरू आहे. रविवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषणकर्त्या 20 महिलांनी आंदोलन स्थगित केले. याची घोषणा छत्रपती प्रशासन महिला आघाडीच्या नेत्या दिव्या मगदूम यांनी केली. दोन आठवडय़ात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ घेऊन, जिल्हय़ातील मंत्री, आमदार, खासदार व आंदोलकांची व्यापक बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी लेखी पत्राद्वारे आंदोलकांना दिल्याचे मगदूम यांनी सांगितले.
खासदार माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत याप्रश्नी बैठक घडवून आणण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी करवीरच्या तहसिलदार शितल मुळे-भामरे, गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, उपनिरीक्षक मनीषा नारायणकर, तलाठी महेश सूर्यवंशी उपस्थित होते.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात तासभर या प्रश्नी बैठक झाली. त्यामध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांनी पूरग्रस्त महिलांना कोणताही शारिरिक अथवा मानसिक त्रास होईल अशा प्रकारे कर्जवसुली करू नये अन्यथा कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांना दिले. त्यामुळेही आंदोलनकर्त्या महिलांचे समाधान झाल्याने आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा करण्यात आली.
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जातून सरकारने महिलांना मुक्त करावे, यासाठी निगडेवाडी येथे पंचगंगा नदीकाठावर छत्रपती शासन महिला आघाडीतर्फे 1 जानेवारीपासून जलआंदोलन सुरू होते. महिलांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी खासदार धैर्यशील माने यांचे प्रयत्न सुरू होते. खासदार माने शुक्रवारी आंदोलकांची भेट घेण्यासाठी गेले असता काही महिलांनी थेट नदीपात्रात धाव घेतली. त्यामुळे खासदार माने यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन आंदोलनावर तोडगा काढण्याची सुचना केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांनी मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्ज वसुलीबाबत पत्र काढून तीन आठवडे सक्तीची कर्जवसुली करु नये असे निर्देश कंपनीना दिले होते. तरीही महिलांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. खासदार माने यांनी रविवारी सकाळी आंदोलन स्थळी भेट दिली. महिलांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दोन आठवडय़ात मुख्यमंत्री ठाकरे यांची वेळ घेऊन व्यापक बैठक घेण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना दिले. खासदार माने यांच्या आश्वासनानंतर दिव्या मगदुम यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.