गळतगा येथील दुर्घटना : सुमारे अडीच लाखाचे नुकसान : अग्निशमन दल उशीरा पोहचल्याने संताप
वार्ताहर/ खडकलाट
गळतगा येथील गळतगा-बेडकीहाळ मार्गावरील सुमारे दोन एकर उसाला अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला कळविल्यानंतरही अग्निशमन दल संपूर्ण ऊस जळून खाक झाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर घटना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गळतगा येथील सर्व्हे नंबर 302/3 ब ही दीड एकर शेती बंडू रामा रुग्गे यांची आहे. शिवाय त्याच सर्व्हे नंबरमध्ये सुरेश धनपाल रुग्गे यांची देखील अर्धा एकर शेती आहे. सदर शेती गळतगा-बेडकीहाळ मार्गालगत असून या शेतामध्ये 86032 जातीचे ऊस लावण करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसापासून व्यंकटेश्वरा सहकारी साखर कारखान्याकडून ऊसतोड सुरू आहे. दरम्यान शनिवारी रात्री वाटेकऱयाचा फोन आल्यानंतर आग लागल्याचे समजले. यानंतर सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी ताबडतोब रुग्गे यांनी अग्निशमन दलाला दूरध्वनीवरून सदर घटनेची माहिती दिली. सुमारे तासाभरानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी संपूर्ण ऊस जळून खाक झाला होता. तसेच आगीमध्ये ड्रीप पाईपलाईन संपूर्णतः जळून खाक झाली आहे. यामुळे रुग्गे यांना सुमारे एक लाख रुपयाचे अधिक नुकसान सहन करावे लागले आहे. या आगीमध्ये बंडू रामा रुग्गे यांच्या शेतातील सुमारे दीड एकर ऊस जळून त्यांचे सुमारे एक लाख रुपये तर सुरेश धनपाल रुग्गे यांच्या शेतातील अर्धा एकर ऊस जळून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले.
अधिकारी नॉटरिचेबल
सदर आगीची घटना शनिवारी रात्री घडल्याने त्यावेळी कोणतेही अधिकारी घटनास्थळी दाखल होऊ शकले नाहीत. दुसऱया दिवशी रविवार असल्याकारणाने बंडू रामा रुग्गे व बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य वर्धमान रुग्गे आदीसह अनेक शेतकरी वर्गाने अधिकाऱयांना दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण रविवार असल्याकारणाने सर्व अधिकाऱयांचे फोन नॉटरिचेबल व स्विच ऑफ येत होते.
आग विझवण्यासाठी शेकडो नागरिकांची धाव
आगीची घटना रात्री नऊ वाजता घडली असली तरी सदर शेती गळतगा- बेडकीहाळ या महामार्गावरच असल्याकारणाने मोठय़ा प्रमाणात या रस्त्यावरून नागरिकांची वर्दळ असते. आग लागल्याची घटना समजताच घटनास्थळी शेकडो नागरिकांनी धाव घेतली. आग विझवण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करूनही आग आटोक्मयात आणण्यात नागरिकांना अपयश आले.