दूरसंचार कंपन्यांमधील वातावरण गढूळ _ सीसीआयच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या दूरसंचार क्षेत्राचे वातावरण पूर्णपणे बदलत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये मोठय़ा कंपन्यांची परिभाषा बदलत असल्याने याचा काहीसा नकारात्मक प्रभाव दूरसंचार कंपन्यांवर होत असल्याचे कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया (सीसीआय) यांनी दूरसंचार क्षेत्राच्या एका अभ्यास अहवालातून सांगितले आहे.
2016 मध्ये जिओचे सादरीकरण झाल्यानंतर दूरसंचार उद्योगाने मोठे वळण घेतले आहे. यामध्ये टेलिकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) यांच्या निर्णयांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. ट्रायने 2017 मध्ये मोबाईल टर्मिनेशन शुल्कात कपात आणि 2018 मध्ये सिग्निफिकेंट मार्केट पॉवर (एसएमपी) ची नवीन परिभाषा निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता.
सीसीआयच्या ताज्या अहवालानुसार दूरसंचार क्षेत्रातील आणखी एक कंपनी दूरसंचार क्षेत्रातून बाहेर जाण्याचे संकेत आहेत. या कारणामुळे या क्षेत्रात दोन कंपन्यांमध्ये दबदबा राहण्याची दाट शक्यता आहे. कारण एकावेळी या क्षेत्रात जवळपास 15 कंपन्या होत्या.
स्पर्धात्मक वातावरणामुळे तणाव
भारतामधील दूरसंचार बाजारात कमी किंमतीवरून स्पर्धा रंगली आहे. यामुळे स्पर्धात्मक वातावरणामुळे दूरसंचार कंपन्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
5-जी तंत्रज्ञानासाठी लागणार वेळ
कमकुवत स्पर्धात्मक वातावरणामुळे दूरसंचार क्षेत्रात आगमन होणाऱया 5-जी तंत्रज्ञानाचा प्रवेश हा लांबणीवर पडणार असून यामध्ये 5-जी तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग करण्यासाठी प्रतिस्पर्धी बाजारपेठ तयार करणे कठीण होणार असल्याचे सीसीआयने स्पष्ट केले आहे.