10 संघांची दोन गटात विभागणी, सर्व संघ प्रत्येकी 14 सामने खेळणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सर्व सहभागी संघ 2 गटात विभागले गेले असून अ गटात मुंबई, केकेआर, राजस्थान, दिल्ली व लखनौ तर ब गटात चेन्नई, हैदराबाद, आरसीबी, पंजाब व गुजरात यांचा समावेश केला गेला आहे. दोन्ही गटात प्रत्येकी 5 संघ असले तरी प्राथमिक टप्प्यात त्यांचे प्रत्येकी 14 सामने होणार आहेत.
एरवी दरवर्षी आयपीएल स्पर्धेत 8 संघ सहभागी होत असतात आणि त्यांच्यात 7 घरच्या व 7 प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर, असे 14 सामने खेळवले जात असत. यंदा गटनिहाय विभागणी केली गेली. यापूर्वी पुणे वॉरियर्स व कोची टस्कर्स हे संघ सहभागी असताना आयपीएलमध्ये अशी गटनिहाय रचना करण्यात आली होती. त्याची पुनरावृत्ती यंदा झाली आहे.
मुंबई-पुण्यात 70 सामने
यंदा आयपीएलच्या 15 व्या आवृत्तीत मुंबई व पुणे येथील 4 स्टेडियम्सवर एकूण 70 सामने खेळवले जातील, अशी घोषणा आयपीएल कार्यकारिणीने यावेळी केली. स्पर्धेतील प्ले-ऑफचे सामन्यांबाबत नंतर निर्णय घेतला जाणार आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियम व डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी 20, ब्रेबॉर्न स्टेडियमवर 15 तर पुण्यातील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर 15 सामने खेळवले जातील. सर्व संघ वानखेडे व डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी 4 तर ब्रेबॉर्न व पुणे स्टेडियमवर प्रत्येकी 3 सामने खेळेल. साखळी फेरीत 70 सामने होतील आणि नंतर प्ले-ऑफमध्ये 4 सामने होणार आहेत.
अ गट ः मुंबई इंडियन्स, केकेआर, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपरजायंट्स.
ब गट ः चेन्नई सुपरकिंग्स, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स.
अशी करण्यात आली गटनिहाय रचना
आयपीएलमधील प्रदर्शनाच्या आधारे स्पर्धेतील संघांना विभागण्यात आले. प्रारंभी, सर्वाधिक जेतेपदांच्या निकषावर मुंबई इंडियन्सचा (5 जेतेपदे) अ गटात पहिला तर चेन्नई सुपरकिंग्सचा (4 जेतेपदे) ब गटातील दुसरा संघ म्हणून समावेश करण्यात आला. 2 जेतेपदे मिळवणारा केकेआरचा संघ अ गटात तिसरा तर सनरायजयर्स हैदराबाद एकमेव जेतेपदासह ब गटात चौथ्या स्थानासह समाविष्ट झाला. आयपीएल एकदाच जिंकणारा आणखी एक संघ राजस्थान रॉयल्स अ गटात पाचवा तर 3 फायनल्स खेळणारा आरसीबीचा संघ ब गटातील सहावा संघ ठरला.
एकदा फायनलपर्यंत व दोनवेळा प्ले-ऑफपर्यंत पोहोचणाऱया दिल्ली अ गटातील सातवा आणि एकदा फायनलपर्यंत पोहोचणारा पंजाब किंग्स ब गटातील आठवा संघ राहिला. लखनौ सुपर जायंट्स अ गटातील 9 वा तर गुजरात टायटन्स ब गटातील 10 वा संघ म्हणून समाविष्ट झाले.
प्रत्येक गटात 4 प्रतिस्पर्धी. तरीही प्रत्येक संघाचे 14 सामने कसे?
एरवी, आयपीएलमध्ये 8 संघ सहभागी असताना सर्व संघ प्रत्येकी 14 सामने खेळत असत. पण, यंदा 2 संघ वाढले असले तरी सर्व संघ प्रत्येकी 14 सामनेच खेळणार आहेत. ते कसे साध्य होईल, याचा तपशील बीसीसीआयने जाहीर केला. या तपशीलानुसार, सर्व संघ गटांतर्गत प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध प्रत्येकी दोनवेळा लढतील आणि हे 8 सामने होतील. याशिवाय, अन्य 6 सामने ते दुसऱया गटातील प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळतील. उदाहरणार्थ, साखळी गटातील सामने झाल्यानंतर अ गटात पहिले स्थान मिळविणारा संघ ब गटात पहिले स्थान मिळविणाऱया संघाविरुद्ध दोन सामने खेळेल व उर्वरित चार संघांविरुद्ध ते फक्त एकच सामना खेळतील. अ गटात दुसरे स्थान मिळविणारा संघ ब गटात दुसरे स्थान मिळविणाऱया संघाविरुद्ध दोन सामने खेळेल तर उर्वरित चार संघांविरुद्ध फक्त एकेकच सामना खेळेल. अशा प्रकारे नंतरचे क्रम मिळविणाऱया संघांचे सामने होतील. याप्रमाणे सर्व संघांचे प्रत्येकी 14 साखळी सामने होणार आहेत.