प्रतिनिधी / सातारा :
जिल्हयात सध्या कोरोना स्थिती आटोक्यात आल्याने नागरिकांचा दीपावलीचा उत्साह द्विगुणित झाला आहे. तसेच अनलॉक प्रक्रियेमुळे जगरहाटी सुरु करण्यात आल्याने सर्वत्र गर्दीही होत आहे. या स्थितीत जिल्हय़ात 85 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून 37 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. मात्र, 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी दीपावली सुट्टीनंतर प्रशासन सजग झाले आहे. दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांनाच आता शासकीय कार्यालयासह खासगी आस्थापना, हॉटेल्स, दुकाने येथे प्रवेश मिळणार आहे.
लसीकरण 100 टक्के पूर्ण करुन तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत प्रशासन प्रमुखांसाठी आदेश जारी केला आहे. सर्व नोडल अधिकाऱ्यांना लसीकरण 100 टक्के पूर्ण करण्यासाठी सर्तक करण्यात आले असून त्यांनी त्यांच्या सर्व क्षेत्रीय कार्यालये व त्यांच्या विभाग प्रमुखांना सूचना देण्याचा आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनातील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे की नाही याची खात्री करावी. लस घेतली नसल्यास शासकीय कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या डोसची मात्रा पूर्ण करुन घ्यावी. न घेतल्यास संबंधित शासकीय, निमशासकीय स्तरावरील कार्यालय प्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
तसेच जिल्हय़ातील सर्व दुकाने, उपहारगृहे, हॉटेल्स सुरु ठेवण्यासाठी त्या ठिकाणी काम करत असलेल्या सर्व व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करणे बंधनकारक असून सर्व शासकीय विभाग, खासगी आस्थापना सुरु ठेवण्यासाठी त्या ठिकाणी काम करणाऱया सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.