मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची माहिती : पहिल्या पॅकेजमध्ये तरतुदी नसणाऱयांना मिळणार लाभ
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे फटका बसलेल्या अनेकांना राज्य सरकारने अलिकडेच 1,250 कोटींचे पॅकेज घोषित केले आहे. येत्या दोन-तीन दिवसात दुसरे आर्थिक पॅकेज घोषित करणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिली.
बेंगळूरमधील आपल्या शासकीय निवासस्थानी पालिका कर्मचाऱयांना ग्रॉसरी किटचे वितरण केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन जारी केला आहे. या कालावधीत आर्थिक फटका बसलेल्यांसाठी विशेष पॅकेज घोषित करण्यात आले आहे. विविध समाजघटकांना 1,250 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. आणखी दोन दिवसात दुसरे पॅकेज घोषित करण्यात येईल. याद्वारे सरकार आर्थिक संकटग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर आहे, असे ते म्हणाले.
पॅकेज घोषित करण्याची तयारी
मुख्यमंत्र्यांनी 19 मे रोजी आर्थिक पॅकेज घोषित करताना शेतकरी, भाजी-फळे विक्रेते, ऑटोरिक्षा, कॅब, टॅक्सीचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱयांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते.
मात्र, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक, आशा-अंगणवाडी कर्मचारी व इतर घटकांना या पॅकेजमध्ये तरतूद नव्हती. त्यामुळे विविध संघटनांनी राज्य सरकारवर दबाव आणून स्वतंत्रपणे पॅकेज देण्याची मागणी केली होती. त्यामुळे सरकारने दुसरे पॅकेज घोषित करण्याची तयारी केली आहे.
लॉकडाऊनवाढीबाबत अद्याप अहवाल नाही
राज्यात लॉकडाऊन वाढविण्याबाबत तज्ञांनी अद्याप कोणताही अहवाल सरकारला दिलेला नाही. परिस्थिती पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल. 5 जून किंवा 6 जून रोजी मंत्री आणि तज्ञांशी चर्चा करून आपण निर्णय घेणार आहे. 7 जूनपर्यंत लॉकडाऊन जारी आहे. तोपर्यंत संसर्ग किती प्रमाणात नियंत्रणात येईल, यावर लक्ष ठेवण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा म्हणाले.
काही जिल्हय़ांमध्ये कोरोना संसर्ग अंदाजापेक्षा अधिक वाढला आहे. केंद्रीय गृहखात्याने लॉकडाऊन वाढविण्याचे अधिकार संबंधित राज्यांना दिले आहेत. त्यामुळे परिस्थितीचे अवलोकन करून पुढील 5 किंवा 6 जून रोजी बैठकीत स्पष्ट निर्णय घेण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात सेवाकार्य केले जात आहेत. राज्यातील 29 हजार खेडय़ांमध्ये ‘सेवा ही’ संघटनेच्या नावाने कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या माध्यमातून राज्यातील 1 कोटी लोकांना मदत करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे, असे येडियुराप्पा यांनी सांगितले.