एलऍण्डटी कंपनीने दिली माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणाऱया हिंडलगा पंपिंग स्टेशनमधील पॅनलबोर्ड खराब झाल्याने दोन पंप बंद झाले होते. परिणामी शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला होता. पॅनल बोर्डच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या दोन दिवसात संपूर्ण शहराला सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती एलऍण्डटी कंपनीकडून देण्यात आली आहे.
शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, काही ठिकाणी अर्धा-एक तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागात पंधरा ते 20 दिवसांपासून पाण्याचा थेंबही मिळाला नाही. त्यामुळे शहरात पाणीटंचाई समस्या निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांवर भटकंती करण्याची वेळ आली असून, काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 20 दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे ही समस्या केव्हा सुटणार असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
कधी विद्युतपुरवठा खंडित झाल्याने तर कधी जलवाहिनी दुरूस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद होत आहे. पण यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्याकडे प्रशासन आणि एलऍण्डटी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. पाणीटंचाई निर्माण झालेल्या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची सुविधा यापूर्वी उपलब्ध होती. मात्र टँकरने पाणीपुरवठा करण्याकडे तसेच कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा करण्याकडे एलऍण्डटी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. पाणीपुरवठा झाला नसल्यास कूपनलिका आणि विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात असे पण काही ठिकाणी कूपनलिकांचे विद्युतपंप नादुरूस्त झाले आहेत. याचा फटका नागरिकांना बसत आहे.
पॅनलबोर्ड दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून, 600 अश्वशक्तीचे दोन पंप आणि 400 अश्वशक्तीचा एक पंप सलग सुरू आहे. पण विद्युतपुरवठय़ात व्यत्यय होत असल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. मात्र येत्या दोन दिवसात संपूर्ण शहराला सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांनी दिली.