प्रतिनिधी/ निपाणी
पंधरा दिवसापूर्वी एकही कोरोना संशयित नसलेल्या निपाणीत दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. असे असतानाही नागरिकांना याचे गांभीर्य दिसून येत नाही. शहर व उपनगरात रस्त्यांवर नागरिकांची सर्रास गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे अशा नागरिकांना आता कोणत्या पद्धतीने समजवायचे? असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
अजमेरहून आलेल्या बेळगाव जिल्हय़ातील विविध ठिकाणच्या 38 जणांना निपाणी बाहेरील वसती शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी तब्बल 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे 10 मे रोजी स्पष्ट झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. या 30 जणांमध्ये निपाणीतील एका महिलेचा समावेश होता. यानंतर मुंबईहून निपाणीत आलेल्या आणखी एका महिलेला कोरोना झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्यामुळे निपाणी शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दोनवर पोहचल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.
असे असतानाही निर्बंध शिथिल केल्याचा गैरफायदा घेत नागरिकांचा वावर रस्त्यांवर वाढला आहे. अनेक ठिकाणी समुहाने जमत काहीजण रस्त्यावर झालेल्या गर्दीला नावे ठेवत आहेत. मात्र आपणदेखील त्यातील एक भाग आहोत. याकडे मात्र डोळेझाक केली जात आहे. शहरातील अशोकनगर, दलालपेठ, नेहरु चौक, जुना पी. बी. रोड या मार्गावर नागरिक व वाहनधारकांची वर्दळ वाढल्याने ऐन लॉकडाऊन काळात निपाणीत वाहतूक कोंडीची समस्या होत आहे. यावरुनच नागरिकांच्या गर्दीची कल्पना येते.
सोमवारी आरोग्य खात्याने जाहीर केल्याप्रमाणे कुडची येथील द्वितीय संपर्कातील तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. अशा द्वितीय संपर्कातील व्यक्ती निपाणीत मोठय़ा प्रमाणात आहेत. या व्यक्ती शहरात मनमोकळेपणाने वावरत आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच नागरिकांनीही स्वतःहून निर्बंध पाळणे आवश्यक बनले आहे.