मालवाहतुकीतून 15 लाख, तर प्रवासी वाहतुकीतून 33 लाख : एसटी वाचविण्यासाठी शासनाच्या मदतीचीच गरज : प्रवासी वाहतुकीला अपेक्षि प्रतिसाद नाही
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीतून मार्ग काढण्यासाठी मालवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. मालवाहतुकीसाठी प्रती किमी 35 रुपये दराने वाहतूक सुरू केली. आता या दरात प्रती किमी 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जिल्हय़ात एसटीच्या माध्यमातून आतापर्यंत 121 फेऱयांच्या माध्यमातून 15 लाखांचे उत्पन्न मिळाले. 22 मेपासून टप्प्याटप्प्याने सुरू केलेल्या प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून या विभागाला 33 लाख 50 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात प्रवासी वाहतुकीसोबतच एसटीला मालवाहतुकीवरही तेवढेच लक्ष देणे एसटी वाचविण्याच्यादृष्टीने महत्वाचे ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुळातच अडचणीत सापडलेले महामंडळ कोरोनामुळे पुरते अडचणीत आले आहे. प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने कर्मचाऱयांना पगार देण्यासाठी महामंडळाकडे पैसा नाही. आतापर्यंत मार्चचा 25 टक्के, मे महिन्याचा 50 टक्के, तर जूनचा 100 टक्के पगारही पेंडिंग आहे. कर्मचाऱयांना कमी करण्याच्याही हालचाली सुरू असल्याचे संघटना आरोप करत आहेत. महामंडळ व संघटना पातळीवरही कर्मचाऱयांच्या वेतनासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. शासनस्तरावरून निधी उपलब्ध न झाल्यास रा. प. कर्मचाऱयांना पगार देणेही पुढील काळात शक्यच नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
22 मेपासून सुरू आहे प्रवासी वाहतूक
रा. प. महामंडळाने 22 मेपासून काही अटी-शर्थींच्या आधारे प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरीही अद्याप प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. दुसरीकडे जिल्हय़ाबाहेरील वाहतूक मार्चपासून म्हणजे सुमारे चार महिने बंद आहे. परजिल्हय़ात प्रासंगिक कराराच्या माध्यमातून बसेस उपलब्ध करून देण्याच्या धोरणामुळेही प्रवासी एसटीकडे वळताना दिसत नाहीत. दुसरा पर्याय म्हणून महामंडळाने मालवाहतुकीला प्राधान्य देत, मालवाहतूक सुरू केली.
सिंधुदुर्गातून मालवाहतुकीच्या 121 फेऱया
सिंधुदुर्ग विभागात मालवाहतूक सुरू केल्यानंतर या विभागातून आतापर्यंत मालवाहतुकीच्या सुमारे 121 फेऱया झाल्या आहेत. यातून 3 लाख 18 हजार किमी प्रवास करत या विभागाला 15 लाखांचे उत्पन्न मिळाले. महामंडळाने यात सिमेंटपासून, चिरे, वाळू ते सर्व प्रकारची मालवाहतूक करण्यावर भर दिला आहे. यासाठी 12 मालवाहतूक बसेस तयार केल्या असून आवश्यकतेनुसार जादा मालवाहतूक बसेस तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. सुरुवातीला 35 रुपये किमी दराने रा. प. महामंडळाकडून मालवाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, मालवाहतूक सुरू केल्यानंतर आता दोन महिन्यांनी प्रति किमी मालवाहतुकीच्या दरात तीन रुपयांची वाढ केली आहे. 19 जुलैपासून मालवाहतुकीचा प्रति किमीचा दर 38 रुपये करण्यात आला आहे. आता नव्याने होणारी सर्व मालवाहतूक 38 रुपये दराने होणार असल्याचे महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
प्रवासी वाहतुकीला अपेक्षित प्रतिसाद नाही
महामंडळाचा मूळ उद्देश असलेल्या प्रवासी वाहतुकीच्या अनुषंगाने महामंडळस्तरावरून प्रयत्न सुरू असले, तरीही अद्याप या प्रवासी वाहतुकीला अपेक्षित प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत नाही. 22 मेपासून ही वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू केली आहे. त्यानुसार आतापर्यंत या प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून या विभागाला सुमारे 33 लाख 50 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. अद्याप प्रवासी वाहतुकीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने व त्यातच कोरोनाचा धोका वाढता असल्याने रा. प. महामंडळाला प्रवासी वाहतुकीसाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.