कणकवलीतील रेश्मा वडर यांनी वाचविला तिघांचा जीव
प्रतिनिधी / कणकवली:
स्वतःसह आपल्या दोन चिमुरडय़ा मुलांना घेऊन विहिरीकडे संशयास्पद वावरणाऱया महिलेला तेथून दूर नेणाऱया कणकवली बांधकरवाडी येथील रेश्मा रामू वडर यांचे कौतूक होत आहे. सदरची घटना 2 मे रोजी सांयकाळी 7 वा. बांधकरवाडी येथील दत्तमंदिरनजीकच्या विहिरीवर घडल्याचे रेश्मा यांचे पती रामू वडर यांनी सांगितले.
रेश्मा वडर या कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागातील आरेखक रामू वडर यांच्या पत्नी. ते बांधकारवाडी येथे राहतात. 2 रोजी सायंकाळच्या सुमारास रेश्मा या मेडिकल स्टोअर्समधे गोळय़ा आणण्यासाठी गेल्या होत्या. गोळ्य़ा घेऊन त्या दत्तमंदिर नजीकच्या विहिरीकडील वाटेने जात होत्या. त्यावेळी त्यांना विहिरीजवळ दोन लहान मुलांच्या मोठय़ाने रडण्याचा आवाज आला. कुतुहल म्हणून रेश्मा यांनी विहिरीजवळ पाहिले असता त्यांना सुमारे चार वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा अशा दोन मुलांसह एक महिला विहिरीच्या कठडय़ावर चढताना दिसली. रेश्मा वडर यांना सदरची महिला दोन मुलांसह आत्महत्येचा विचार करीत असल्याची शंका आली. उडी मारण्याच्या पावित्र्यात असलेल्या त्या महिलेला रेश्मा यांनी प्रसंगावधान राखून यांनी खाली उतरवले. त्यांनी त्या महिलेची समजूत घातली. सदरची महिला जानवली गावातील असल्याचे सांगण्यात आले. ती बांधकरवाडी येथे आपल्या नातेवाईकांकडे आली होती. कौटुंबिक वादाच्या नैराश्येतून ती विहिरीकडे आली होती. मात्र सुदैवाने रेश्मा यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना घडण्यापासून टळल्याचे वडर यांनी सांगितले.