कृष्णात चौगले / कोल्हापूर
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखापर्यंत थकबाकी असलेल्या उर्वरित पात्र शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्यशासनाच्या हालचाली सुरु आहेत. नियमित कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांनाही ५० हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रिया जुलैनंतर सुरू करण्याबाबतच शासन पातळीवर विचार सुरु आहे. पण दोन लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या कर्जमाफीसाठी शासनाने अद्यादेश काढलेला नाही. महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार शेतकर्यांनी दोन लाखांवरील थकबाकीची रक्कम भरली असली तरी कर्जमाफीची रक्कम मिळाल्याशिवाय बँकांकडून नवीन कर्ज देण्यास नकार दिला जात असल्यामुळे शेतकरी ऑक्सिजनवर आहेत.
दोन लाखापर्यंत थकबाकी असणार्या शेतकर्यांबरोबरच दोन लाखांपेक्षा जास्त थकीत कर्ज असणार्या शेतकर्यांना कर्जमाफी देण्याबाबत मंत्रिमंडळाने यापूर्वीच घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी नियमित कर्ज भरणार्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली आहे. ३० जूनपर्यंत नियमित कर्जाची पूर्णफेड केली, तर त्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये व ज्यांची रक्कम २ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनी वरील रक्कम ३० जूनपर्यंत भरल्यास त्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला.
सध्या नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी राज्यशासनाच्या युद्धपातळीवर हालचाली सुरु असल्या तरी दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकर्यांना कर्जमाफी देण्याबाबत कोणताही अद्यादेश काढलेला नाही. त्यामुळे शेतकर्यांसह बँकाही संभ्रमात आहेत. शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत दोन लाखांवरील थकबाकीची रक्कम शेतकर्यांनी ३० जूनपूर्वी भरली आहे. तरीही कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याशिवाय नवीन कर्ज देण्यासाठी बॅंकांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे ऐन खरीप हंगामात शेतकरी अर्थिक अरिष्ठात सापडला आहे.
जिल्ह्यातील ५ हजार ९७४ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत
जिल्ह्यात २ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेले ५ हजार ९७४ शेतकरी आहेत. यामध्ये १ हजार ४७४ शेतकरी जिल्हा बँकेतील असून त्यांची २९.४३ कोटींची थकबाकी आहे. तर इतर बँकांकडे ४ हजार ५०० शेतकरी थकबाकीदार आहेत. ३० जूनपर्यंत २ लाखावरील कर्ज भरलेल्या शेतकर्यांच्या याद्या काही दिवसात सहकार विभागाकडे जमा करून त्या शासनाकडे पाठवल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत.
राज्यातील ११ लाख शेतकऱयांना लवकरच मिळणार कर्जमाफीचा लाभ
राज्यातील सुमारे ३० लाख शेतकर्यांची कर्जमुक्ती करणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. यापैकी जवळपास १९ लाख शेतकर्यांच्या कर्ज खात्यावर पैसे जमा झाले. पण ज्या गावांमध्ये सार्वत्रिक निवडणुका सुरू होत्या, तेथे आचारसंहितेमुळे कर्जमाफीची रक्कम जमा करता आली नाही. याच दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अर्थिक टंचाईमुळे ११ लाख शेतकर्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया प्रलंबित राहिली. यामध्ये जिल्ह्यातील ७ हजार ९०४ शेतकर्यांचा समावेश आहे. सध्या अर्थिक स्थितीत सुधारणा झाल्यामुळे शासनाने ही कर्जमाफी देण्याची प्रक्रिया गतीमान केली असून लवकरच शेतकर्यांच्या थकीत कर्जाची जबाबदारी घेऊन नवीन कर्ज वाटपाच्या आदेशाची गरज दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ज्या शेतकर्यांनी जूनअखेरवरील रक्कम भरली आहे, त्यांच्या उर्वरित कर्जाची जबाबदारी शासनाने घेऊन संबंधित शेतकर्यांना नवीन कर्ज देण्याचे बँकांना आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.