जिल्हय़ात 2 लाख कुटुंबे बेघर : 20 हजार भूमीहीन
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ात तब्बल 2 लाख 24 हजार 973 कुटुंबे बेघर असल्याची माहिती जिल्हा पंचायतीकडून देण्यात आली. विशेष म्हणजे 19,996 कुटुंबांकडे स्वतःचे घर बांधण्यासाठी जमीन नसल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
लोकसंख्येच्या विस्फोटाबरोबर कुटुंबसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यात एकत्र कुटुंब पद्धती लयास जात असल्याने अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना भाडोत्री घरांचा आसरा घ्यावा लागत आहे. ग्रामीण भागातील कुटुंबांना मात्र एकाच घरात दाटीवाटीने जीवन कंठावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. वाढती महागाई व महामारींच्या जंजाळात हक्काचे घर बांधण्याचे आव्हान या कुटुंबासमोर आहे.
जिल्हा पातळीवर केलेल्या सर्वेक्षणात बेळगाव जिल्हय़ातील 14 तालुक्यांमध्ये 2 लाख 24 हजार 973 कुटुंबांच्या डोकीवर हक्काचे छप्पर नाही. त्यातील 19 हजार 996 कुटुंबाकडे स्वतःचे घर बांधण्यासाठी जागासुद्धा नाही. सामान्य वर्गातील 1 लाख 75 हजार 42, अनुसूचित जाती 16 हजार 880, अनुसूचित जमाती 12 हजार 876 तर 20 हजार 175 अल्पसंख्याक कुटुंबे बेघर असल्याचे हा अहवाल सांगतो.
चार वर्षांत केवळ 24 हजार लाभार्थी
गेल्या दोन वर्षांपासून वसती योजनांची अंमलबजावणी अत्यंत संथगतीने सुरू आहे. चार वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेतून केवळ 24 हजार 218 कुटुंबांना घरे उपलब्ध झाली आहेत. त्यातील 14 हजार 308 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. तर 2,193 लाभार्थींना विविध कारणांनी तिरस्कृत करण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेशिवाय इंदिरा आवास योजना, डॉ. आंबेडकर निवास योजना तसेच अलिकडे रोजगार हमी योजनेमधूनही घरकुल उपलब्ध करून देण्यात येत आहे. जीपीएससारख्या अडचणींमुळे अनेक लाभार्थी वंचित राहत आहेत. तसेच स्वतःची जागा नसल्याचा फटकाही अनेकांना बसत आहे.
तालुका | बेघर कुटुंबे | भूमीहीन कुटुंबे | पीएमएवाय लाभार्थी |
बेळगाव | 24849 | 3566 | 1452 |
खानापूर | 13980 | 1738 | 1384 |
अथणी | 21621 | 1262 | 2330 |
बैलहोंगल | 11625 | 1614 | 1538 |
चिकोडी | 16449 | 362 | 806 |
गोकाक | 10972 | 1637 | 2835 |
हुक्केरी | 18472 | 371 | 3749 |
कागवाड | 5587 | 555 | 519 |
कित्तूर | 7582 | 1127 | 758 |
मुडलगी | 4975 | 1184 | 2535 |
निपाणी | 17269 | 775 | 429 |
रामदुर्ग | 15450 | 2125 | 694 |
रायबाग | 18336 | 1480 | 1816 |
सौंदत्ती | 17810 | 2300 | 3373 |