38 संघांचा सहभाग, विविध गटातील लढतींचे बिगूल वाजणार, कर्नाटक रेल्वेविरुद्ध तर महाराष्ट्र आसामविरुद्ध लढणार
अहमदाबाद / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेटचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱया रणजी क्रिकेट स्पर्धेत पहिल्या फेरीतील लढतींना आजपासून (गुरुवार दि. 17) प्रारंभ होत असून क गटातील कर्नाटक वि. रेल्वे लढत चेन्नईत तर ग गटातील महाराष्ट्र वि. आसाम लढत रोहटकमध्ये खेळवली जाणार आहे. दोन वर्षांच्या सक्तीच्या ब्रेकनंतर स्पर्धेला प्रथमच सुरुवात होत असताना अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्यासारख्या खेळाडूंना कसोटी क्रिकेटमध्ये परतण्यासाठी या माध्यमातून ही संधी असेल.
‘कोरोनाच्या तिसऱया लाटेमुळे रणजी क्रिकेट स्पर्धेला सलग दुसऱयांदा धोका होता. पण, नव्या रुग्णांची संख्या घटत असल्याने बीसीसीआयला बायो-बबलमध्ये स्पर्धेचे आयोजन करणे शक्य होत आहे’, असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले.
देशभरात रणजी स्पर्धेसाठी 9 ठिकाणी 9 बायो-बबल केंद्रे उभी केली गेली असून खेळाडूंना 5 दिवसांचे सक्तीचे क्वारन्टाईन होते. त्यामुळे, सामने असलेल्या ठिकाणी सरावासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी उपलब्ध होता. मात्र, मुळातच दोन वर्षांच्या ब्रेकनंतर स्पर्धा सुरुवात होत असल्याने खेळाडूंचीही याबद्दल तक्रार नाही, असे एकंदरीत चित्र आहे.
प्लेट स्तरावर 6 संघ
जवळपास दोन हंगामांच्या ब्रेकमुळे एकीकडे, फलंदाजांनी चेंडू सोडून देण्याची कला व गोलंदाजांनी बडय़ा स्पेलमध्ये टिच्चून मारा करण्याची कला विसरल्यात जमा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र या सर्व बाबी सुरु होतील. या स्पर्धेसाठी इलाईट स्तरावर 8 गटातून प्रत्येकी 4 संघ विभागले गेले आहेत तर 6 संघ प्लेट गटातून लढणार आहेत. यंदा उपउपांत्यपूर्व गटातील लढतीचा अपवाद वगळता बाद फेरीतील अन्य सर्व लढती आयपीएलच्या पहिल्या टप्प्यानंतर खेळवल्या जातील.
मागील 24 महिन्यांच्या कालावधीत भारत अ संघाचा एकमेव दौरा झाला असून आता रणजी स्पर्धेच्या निमित्ताने प्रियंक पांचाळ, अभिमन्यू ईश्वरन, हनुमा विहारी यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. दक्षिण आफ्रिका दौऱयात सहभागी असलेल्या या त्रिकुटाला मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतून आश्चर्यकारक डच्चू देण्यात आला होता. यू-19 वयोटातील स्टार खेळाडू कर्णधार यश धुल व राज अंगद बावा या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथमश्रेणी पदार्पण करण्यासाठी सज्ज असतील. यापैकी यश धुल हा दिल्लीतर्फे तामिळनाडूविरुद्ध लढतीसाठी चेन्नईत आहे.
जर पहिला डाव झाला नाही तर दोन्ही संघांना गुण विभागून दिले जातील. यंदा या स्पर्धेतील सामने राजकोट, कटक, अहमदाबाद, चेन्नई, तिरुवनंतपूरम, दिल्ली, हरियाणा, गुवाहाटी व कोलकाता येथे खेळवले जाणार आहेत.
पहिल्या फेरीतील सामने
लढत / गट / ठिकाण
कर्नाटक वि. रेल्वे / क / चेन्नई
हैदराबाद वि. चंदिगड / ब / भुवनेश्वर
केरळ वि. मेघालय / अ / राजकोट
गुजरात वि. मध्य प्रदेश / अ / राजकोट
मणिपूर वि. अरुणाचल प्रदेश / प्लेट / कोलकाता
जम्मू व काश्मीर वि. पुडूच्चेरी / क / चेन्नई
सौराष्ट्र वि. मुंबई / ड / अहमदाबाद
ओडिशा वि. गोवा / ड / अहमदाबाद
नागालँड वि. सिक्कीम / प्लेट / कोलकाता
बिहार वि. मिझोराम / प्लेट / कोलकाता
झारखंड वि. छत्तीसगड / ह / गुवाहाटी
महाराष्ट्र वि. आसाम / ग / रोहटक
विदर्भ वि. उत्तर प्रदेश / ग / गुरुग्राम
हरयाणा वि. त्रिपुरा / फ / दिल्ली
पंजाब वि. हिमाचल प्रदेश / फ / दिल्ली
सेवादल वि. उत्तराखंड / ई / तिरुवनंतपूरम
आंध्र वि. राजस्थान / ई / तिरुवनंतपूरम
विद्यमान जेते सौराष्ट्र-मुंबई लढत मुख्य आकर्षण केंद्र
विद्यमान विजेते सौराष्ट्र व 41 वेळचे चॅम्पियन्स मुंबई यांच्यातील लढत विशेष आकर्षण केंद्र ठरणार आहे. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या लढतीच्या निमित्ताने आमनेसामने भिडतील. दोन्ही अनुभवी खेळाडूंनी नेट्समध्ये कसून सराव केला असून त्यांच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा त्यांच्या प्रशिक्षकांनी केली आहे. श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघनिवड लवकरच होणार असून त्या पार्श्वभूमीवर, या उभयतांची येथील कामगिरी महत्त्वाची असेल.
2 खेळाडू राखीव, त्यामुळे किमान 9 खेळाडू तंदुरुस्त असले तरी सामना होणार!
सर्व संघांना दोन कोव्हिड-19 राखीव खेळाडू ठेवण्याची सूचना केली गेली असून एखाद्या संघात कोरोनाचा शिरकाव झाला तर हे दोन राखीव खेळाडू खेळवण्याची मुभा असणार आहे. स्पर्धेच्या मध्यात कोरोनाची एन्ट्री नाकारता येण्याची स्थिती नाही. मात्र, किमान 9 तंदुरुस्त खेळाडू असतील तर सामना पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे होईल, असे आयोजकांनी जाहीर केले. अशा परिस्थितीत कोरोनासाठी राखीव असलेले 2 खेळाडू सदर संघांना मैदानात उतरवले जाणार आहेत.