प्रतिनिधी / कोल्हापूर
पंचगंगेत मिसळणारे 90 टक्के दुषीत पाणी कोल्हापूर महापालिकेने थांबवले आहे. पंचगंगा काठावरील 39 गावांतून मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी 22 कोटींचा आराखडा बनवला आहे. एसटीपी प्लँटची जबाबदारी गावांची आहे. या गावांची 15 दिवसांत बैठक घ्या, त्याचा अहवाल आपल्याला द्या. 14 व्या वित्त आयोगातून यासाठी खर्च करण्यास परवानगी मिळाली आहे. प्रत्येक गावात एसटीपी प्लँट उभारण्यास दोन वर्षे लागतील. दोन वर्षांत पंचगंगा प्रदुषणमुक्त करू, अशी ग्वाही पालकमंत्री, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीची जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये शुक्रवारी सभा झाली. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रकांत जाधव, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
प्रशासकीय मंजुरी एप्रिल, मे महिन्यात घ्या
पालकमंत्री पाटील म्हणाले, कामे मंजूर असली तरी प्रशासकीय मान्यतेसाठी सहा, सहा महिने ती रखडत आहेत. त्यामुळे सर्व कामांच्या प्रशासकीय मान्यता या एप्रिल, मे महिन्यांत घ्याव्यात, असा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सक्ती केली जाणार आहे. प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यास मे महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ऑगस्टपर्यत निधी खर्च होण्यास गती येणार आहे.
11 नाविन्यपुर्ण योजनांना मान्यता, वॉटरबेलद्वारे पाणी देण्याची याजना
ते म्हणाले, बैठकीत मौजे कोडोली येथे नळ कनेक्शनला वॉटर मीटर, विभागीय स्तरावर पुणे येथे तलाठी प्रशिक्षण केंद्र, दिव्यांगांना कृत्रीम अवयव, महिला सबलीकरणासाठी एकात्मिक बालविकास सेवा प्रशिक्षण उपक्रम, पद्मश्री ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन केंद्र, अंबाबाई मंदिर परिसर सुधारणेंतर्गत भुयारी केबल, पुरातत्व विभागात अग्निशमन यंत्रणा, महापालिका हॉस्पिटलमध्ये रक्तघटक विघटन यंत्रणा (बीएसयू), कागलमधील क्रीडा संकुलात टर्फची निर्मिती यांचा समावेश आहे. जिल्हय़ातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी बोटलद्वारे दिले जाणार आहे. त्यासाठी वॉटरबेल योजना राबवली जाणार आहे. कोल्हापुरात 12 ठिकाणी नव्याने वाहतूक सिग्नल उभारले जाणार आहेत. त्यासाठी सव्वाकोटीची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.
बहुमजली पार्किंगचे पुढील आठवडय़ात भूमीपुजन
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर विकास आराखडय़ाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यातील सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंगची निविदा निघाली आहे. या कामाचे भुमीपूजन पुढील आठवडय़ात करत असल्याचे त्यांनी सांगितले.
5 वर्षात ‘नाविन्यपूण’मधून घडलेल्या गोष्टींची चौकशी करणार
गेल्या पाच वर्षांत नाविन्यपूर्ण योंजनांच्या नावाखाली काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. त्याच्या चौकशीसाठी परवानगी मागितली आहे. गेल्या आठवडय़ात भीमा कोरेगावसंदर्भात बैठक झाली. त्यात घटनेची माहिती, दाखल गुन्हे, नियुक्त आयोगाच्या अहवालावर चर्चा झाली. पुढील आठवडय़ात दुसरी बैठक होणार आहे.
‘शतकोटी’ वृक्षरोपणासंदर्भात चौकशी होणारच
जिल्हय़ात वन, सामाजिक वनीकरण विभागाकडून शतकोटी वृक्षलागवड योजना राबवली गेली. यात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आहे. यात चुकीचे घडले असल्यास चौकशी होणारच, असे त्यांनी सांगितले.
भारत बटालियनसाठी नंदवाळ येथील जागेला मंजुरी
भारत राखीव बटालियनसाठी आपणच प्रस्ताव दिला होता, त्यांना जिल्हय़ात जागा मिळत नव्हती. आता नंदवाळ ग्रामपंचायतीने ठराव दिल्याने या जागेला मुख्यमंत्री ठाकरे, महसुलमंत्री बाळासो थोरात यांनी मंजुरी दिली आहे.
राजर्षी शाहू समाधीस्थळासाठी ‘समाजकल्याण’मधून निधी
कोल्हापुरातील राजर्षी शाहू समाधीस्थळासाठी समाज कल्याण विभागाकडून निधी दिला आहे. आताही याअंतर्गत उर्वरीत कामासाठी निधी दिला जाणार आहे. माणगाव परिषदेला 6 मार्चला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. हा शताब्दी महोत्सव लोकोत्सव व्हावा, यासाठी 50 लाखांची तरतूद केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामविकास मंत्री शेतीवरील चर्चेनंतर बाहेर..पालकमंत्र्यांची सारवासारव
पत्रकार परिषदेत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सुरूवात केली. ‘गोकुळ’वर चर्चा नको, असें सांगत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे माईक दिला. शेतीशी निगडीत प्रश्नांवर उत्तरे दिल्यानंतर बेठकीतून मंत्री मुश्रीफ निघून गेले. त्यामुळे यांच्या जाण्याने चर्चेला उधाण आल्याने पालकमंत्र्यांनी सारवासारव केली.