आंबोली घाटात सापडला होता महिलेचा मृतदेह
जबर मारहाणीच्या होत्या खुणा
सावंतवाडी:
35 ते 40 वयोगटातील अनोळखी महिलेचा खून करून आंबोली घाटातील दरीत मृतदेह टाकण्यात आला होता. दोन वर्षे उलटूनही त्या अनोळखी महिलेची ओळख पटलेली नाही. तिची ओळख पटविण्यासाठी व माहिती देणाऱयास पोलिसांनी दहा हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. परंतु या घटनेला दोन वर्षे उलटून गेले तरी पोलिसांना धागेदोरे सापडलेले नाहीत.
आंबोली घाटातील दरीत 20 मार्च 2019 रोजी होळी उत्सवासाठी लागणारे झाड आणण्यासाठी आंबोली ग्रामस्थ गेले होते. त्यावेळी त्यांना महिलेचा मृतदेह आढळला होता. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला. मृत महिलेच्या अंगावर जबर मारहाणीच्या 37 खुणा आढळल्या होत्या. वैद्यकीय अहवालानुसार नाक-तोंड दाबल्यामुळे गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न संशयिताने केला. संशयितांनी महिलेला वाहनातून आणून दरीत फेकल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. या महिलेवर संशयितांनी अत्याचार केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता.
या घटनेनंतर पोलिसांनी गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात या महिलेचे वर्णन पाठविले. मात्र, अद्यापही अशा वर्णनाची महिला बेपत्ता असल्याची नोंद नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ती कोण असा प्रश्न पोलिसांसमोर आहे. महिलेच्या अंगात लाल-पिवळे पट्टे असलेली साडी, साडीच्या काठावर फुलांची डिझाईन, अंगात काळपट रंगाचा ब्लाऊज, साडीला निरपीन, दोन्ही कानात साखळीसह कर्णफुले व कानाच्या मध्यभागी छोटी गोल रिंग, दोन्ही हातात सोनेरी रंगाच्या जाड बांगडय़ा, अंगठय़ा, हातावर मेंदी काढलेली होती. पायात पिवळसर रंगाचे पाच नंबरचे प्लास्टिकचे चप्पल होते. या वर्णनावरून महिला परराज्यातील असावी, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता.
तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या नेतृत्वाखाली या गुन्हय़ाचा तपास सुरू होता. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकानेही खुनाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यश न आल्याने पोलिसांना बक्षीस जाहीर करण्याची वेळ आली. तसेच मृतदेह मिळाला तेव्हा तिचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता. तरी पोलीस यंत्रणेला धागेदोरे सापडलेले नाहीत. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी या गुन्हय़ाची फाईल पुन्हा उघडून खुनाचा तपास लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. n