ऑनलाईन टीम / लखनऊ :
हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखेर मौन सोडले आहे. योगी यांनी या प्रकरणावर एक ट्विट केले आहे. ‘उत्तर प्रदेशातील आई-बहिणीच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला धक्का पोहचवणाऱ्यांचा पूर्णतः नाश निश्चित आहे. या प्रकणातील दोषींना अशी शिक्षा मिळेल, की भविष्यात ते उदाहरण म्हणून पाहिले जाईल. यूपी सरकार आपल्या आई-बहिणीच्या रक्षणासाठी वचनबद्ध आहे’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
14 सप्टेंबरला संबंधित अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार झाला. त्यावेळी तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही झाला. तिला गंभीर दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी अलिगढ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. 29 सप्टेंबरला सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यानंतर पीडितेवर यूपी पोलिसांनी तिच्या कुटुंबियांच्या परवानगीशिवाय अंत्यसंस्कार केले. त्यामुळे यूपी सरकार आणि पोलिसांविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांना यमुना एक्सप्रेस वे वर पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. त्यामुळे देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात निदर्शने करत यूपी सरकार बरखास्त करण्याची मागणी केली.