अखेर बाबरी विध्वंस होऊन 28 वर्षे लोटल्यानंतर त्या प्रकरणी कट रचून ढाचा पाडल्याच्या आरोपातून भाजपचे ज्ये÷ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंह, साध्वी ऋतंबरा, उमा भारती, साक्षी महाराज, महंत नृत्यगोपाल दास, रामविलास वेदांती, विनय कटियार, शिवसेनेचे तत्कालीन नेते सतीश प्रधान, अयोध्येचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीवास्तव अशा 32 जीवित संशयितांची लखनऊ विशेष जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विहिंपचे अशोक सिंघल, आचार्य गिरिराज किशोर, राजमाता विजयाराजे शिंदे, महंत अवैद्यनाथ, विष्णू हरी दालमिया, मोरेश्वर सावे आदी 17 जणांची सुटका मृत्यूने निकाल लागण्यापूर्वीच केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा वादग्रस्त जागेवर मंदिर उभारण्याचा निर्णय दिला होता तेव्हा या खटल्याला अर्थच उरला नाही अशी जनभावना झाली होती. ती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बोलूनही दाखवली होती. पण निकाल देताना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मंदिर ही या देशातील खूप मोठय़ा लोकसंख्येची आस्था असल्याचे म्हटले होते. तसेच मशीद पाडण्याचे कृत्य बेकायदा ठरवले होते. त्यामुळे या निकालाकडे देशाचे लक्ष होते. मशीद पाडल्यानंतर पंधरा दिवसांनी अडवाणी यांनी राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये एक लेख लिहून ही घटना आपल्या आयुष्यातील एक दु:खद घटना असल्याचे म्हटले होते. दुपारी बारापर्यंत स्थिती आमच्या नियंत्रणात होती मात्र नंतर गर्दी आमच्या नियंत्रणात राहिली नाही हे कबूल करताना त्यानी घुमटावर चढलेल्या कार्यकर्त्यांना माघारी फिरण्याचे आवाहन केले. उमा भारती यांनाही तिथे पाठवले. घुमटावरचे लोक ऐकायला तयार नाहीत मात्र त्यातील बरेचसे लोक मराठी बोलत आहेत असे त्या सांगत आल्याने प्रमोद महाजन यांना अडवाणी यांनी पाठवले. मात्र गर्दीने त्यांचेही ऐकले नाही आणि पोलिसांनी अडवाणी यांना तिथे जाऊ दिले नाही. भाजप नेते सुंदरलाल भंडारी यांनी ते लोक शिवसेनेचे होते असे वक्तव्य केले. पुढे रा. स्व. संघाचे सरसंघचालक झालेल्या रज्जू भैया यांनी हे कृत्य आमच्या शिस्तशीर धोरणात बसणारे नव्हते असा खुलासा केला तर सीबीआयने अडवाणी यांनी इतर 49 नेत्यांच्या मदतीने मशीद पाडायचा कट रचला. जे राम भक्त हुतात्मा होण्यासाठी आले, त्यांना हुतात्मा होऊ दिले जाईल, असे वक्तव्य केल्याचा दावा आरोपपत्रात केला होता. त्यासाठी हजार साक्षीदार उभे केले होते. मात्र केवळ 351 जणांची साक्ष झाली. त्यातून सिद्ध काही झाले नाही. वृत्तपत्रातील छायाचित्रे, टीव्ही चॅनेलचे ऑडिओ, व्हीडिओ सादर केले. मात्र मूळ वृत्तपत्राची प्रत, चॅनेलने बदल केलेला नव्हेतर मूळ व्हीडिओ सादर केले नाहीत, ऑडिओ मधील आवाज सुस्पष्ट नाही या कारणांनी कोर्टाने ते सर्व पुरावे अयोग्य मानले. भाजपच्या नेत्यांनी या कृत्याचा स्पष्ट शब्दात नकार दिला असला तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, ते कृत्य शिवसैनिकांनी केले असेल तर त्यांचा मला अभिमान आहे अशी भूमिका घेतली होती. मात्र प्रत्यक्षात यापैकी कोणालाही दोषी सिद्ध करणे सीबीआयला 28 वर्षांमध्ये जमले नाही. केवळ लांगुलचालनासाठी काँग्रेसने या नेत्यांवर कट रचल्याचा आरोप केल्याचे भाजप नेत्यांनी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अपील करून सांगितले. त्यावर उच्च, सर्वोच्च न्यायालयात खल होऊन अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकालाची जबाबदारी लखनऊ न्यायालयावर सोपवली होती! या सगळय़ा प्रकारात देशाची 28 वर्षे गेली आहेत. बाबरी मशीदच नव्हे देशातील असंख्य प्रकरणांमध्ये सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रांना अपवाद वगळता काहीही सिद्ध करता आलेले नाही. न्यायालयाच्याच एका म्हणण्यानुसार सीबीआय हा सरकारचा पोपट आहे. निकालानंतर येणाऱया प्रतिक्रिया मात्र अत्यंत पातळीहीन आहेत. एका डाव्या नेत्याने न्यायाधीश यादव हे बढतीसाठी मॅनेज झाले असा अश्लाघ्य आरोप केला आहे. या खटल्यात न्या. यादव यांचीही मोठी फरफट झाली आहे याकडे या टीकाकारांनी लक्षच दिलेले नाही. भाजपच्या बाजूने दुय्यम दर्जाच्या नेत्यांच्या टीकेमध्ये काँग्रेसने लांगूलचालन करण्यासाठी सीबीआयचा वापर केला आणि इतके दिवस या नेत्यांना छळले असे म्हटले आहे. शिवसेनेच्यावतीने बाबरीचे घुमट पडले नसते तर राम मंदिर भूमिपूजनाचा दिवस पहायला मिळाला नसता असे म्हणत या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी दोषमुक्त सर्व नेत्यांचे अभिनंदन केले आहे तसेच अभिनंदन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनीही तातडीने केले आहे. या प्रकरणांमध्ये भाजपचे ज्ये÷ नेते मुरली मनोहर जोशी यांनी, आता हे सगळे विसरून मंदिर निर्माण करू आणि देशाला पुढे नेऊ असे म्हटले आहे. या सगळय़ा कोलाहलात भारताच्या जनतेने काय प्रतिक्रिया द्यावी हा जनतेसमोरचा प्रश्नच आहे. अनेक आव्हानांतून डोके वर काढून या विषयावर भाष्य करावे इतकी चांगली स्थिती जनतेचीही राहिलेली नाही. अडवाणींची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. जर गदिमांचे शब्द समजले असते तर त्यांनी नक्कीच वनवासात भेटायला आलेल्या भरताला उद्देशून लिहिलेले शब्द, ‘दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा, अशीच प्रतिक्रिया दिली असती! एम आय एमच्या असदुद्दीन ओवेसी सारख्या अनेक नेत्यांनी हा निकाल आम्हाला मान्य नाही आणि आम्ही त्याविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहोत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. झालेले झाले, ज्यांनी केले ते असामाजिक तत्त्व होते. इथे ’दोष ना कुणाचा’ हेच सत्य तेवढे न्यायालयाने सांगितले आहे.
Previous Articleबिहारमध्ये कुणाची सरशी?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.